वुहानवरुन 13 विद्यार्थिनी आल्या, राज्यातील पहिली चाचणीही झाली, एकही रुग्ण नसलेल्या वर्ध्याने कोरोनाला कसं रोखलं?

| Updated on: Apr 20, 2020 | 12:45 PM

राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, तिकडे वर्धा जिल्ह्यात (No corona cases in Wardha) मात्र प्रशासनाने कोरोनाला एण्ट्रीच करु दिलेली नाही.

वुहानवरुन 13 विद्यार्थिनी आल्या, राज्यातील पहिली चाचणीही झाली, एकही रुग्ण नसलेल्या वर्ध्याने कोरोनाला कसं रोखलं?
Follow us on

वर्धा : राज्यभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असताना, तिकडे वर्धा जिल्ह्यात (No corona cases in Wardha) मात्र प्रशासनाने कोरोनाला एण्ट्रीच करु दिलेली नाही. प्रशासनाच्या काटेकोर नियोजनाने हे शक्य झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यात सर्वात पहिली कोरोना चाचणी वर्ध्यात झाली होती. आश्चर्य म्हणजे चीनच्या वुहान शहरातून वर्ध्याच्या हिंदी विद्यापीठात पोहोचलेल्या 13 विद्यार्थिनींची त्यावेळी चाचणी घेण्यात आली होती. (No corona cases in Wardha)

लहान जिल्हा असतानाही वर्ध्यात सर्वात आधी कलम 144 लागू करण्यात आलं होतं. जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील लोकांना प्रवेश नाही, मजुरांचे लोंढे थांबवून त्यांनाही सुरक्षा दिली, तर धडपडणारी आरोग्य यंत्रणा डॉक्टर ते आशा वर्कर यांनी केलेलं सर्वेक्षण, असे एक ना अनेक उपायांनी वर्ध्याने कोरोनाला दूर ठेवलं आहे. 30 दिवसाच्या या संघर्षात पोलीस, महसूल ,आरोग्य विभागाला नागरिकांनी साथ दिल्याने हे शक्य झालं आहे.

नियम पाळणारे नागरिक आणि मदतीसाठी धडपडणारे तरुण हात नेहमीच हाकेला ओ देण्यासाठी तत्पर असतात. त्याचाच अनुभव वर्धेकरांनी घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत येथील जीवनावश्यक वस्तूच्या वितरणाला सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसात गोंधळ पहायला मिळाला, पण त्यावर लगेच नियंत्रण मिळवत भाजीविक्रेते आणि किराणा दुकानदारांनी ग्राहकांनाही सतर्क केले. घाबरू नका, खबरदारी घ्या असा संदेश जो तो देऊ लागला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

आर्वीच्या आमदाराने घरासमोर धान्यवाटपासाठी जमविलेली गर्दी आणि हातात फवारा घेऊन फोटोसेशन करणाऱ्या नेत्यांची चमकोगिरी सोडली तर येथील नागरिक सजगतेने वागलेत असेच म्हणावे लागेल. अगदीच घरात न करमणाऱ्या तिशीतील युवकांचे लोंढे मॉर्निंग वॉकला घराबाहेर पडले, पण ड्रोनच्या साहाय्याने टिपून त्यांनाही रोखण्यात आलं.

चोरून दुकान उघडणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारावा लागला. अखेर धकडपटशाही, दंडुका आणि विनंत्या करून लॉकडाऊन ,संचारबंदी सारखे उपाय यशस्वी ठरले आहेत.

सेवाग्राम, सावंगी आणि वर्धा शहरातील विदर्भातील नामवंत रुग्णालये कोरोनाच्या काळात वर्धेकरांच्या सेवेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. सेवाग्राम आश्रमातील यात्री निवास आयसोलेशनसाठी लगेच राखीव करण्यात आले. रुग्णलयाच्या 200 खाटा आणि व्हेंटिलेटरचा पुरेसा साठा तयार ठेवण्यात आला.

वर्ध्यात काय काय तयारी?

– जिल्ह्यात दोन मोठे रुग्णालय सावंगी,सेवाग्राम तर जिल्हा सामान्य रुग्णालय,दोन उपजिल्हा रुग्णालय असे मिळून 200 आयसोलेशन बेडची व्यवस्था

– सेवाग्राम वैदकीय रुग्णालयात कोविडच्या पॉझेटीव्ह रुग्णासाठी स्पेशल 100 बेडची व्यवस्था

– वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात 50 बेडची व्यवस्था

– जिल्ह्यात 87 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे

– वैद्यकीय अधिकारी यांचा विचार केला तर 50 डॉक्टर आहेत तर 110 नर्स सध्या आहेत. इतर डॉक्टर आणि नर्स यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू आहे

– मास्क,सॅनिटायझर्स, PPE किट सध्या उपलब्ध आहे

वर्धेकरांनी सोशल डिस्टसिंग पालन करावं असे आवाहन देखील जिल्हा चिकित्सक यांच्या कडून नागरिकांना करण्यात येत आहे.

आतापर्यंत परदेशातून 114 नागरिक जिल्ह्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यादेखील करण्यात आल्या. मुंबई-पुणे आणि इतर जिल्ह्यातून 16876 नागरिक जिल्ह्यात आले. त्यांना होम क्वारनटाईन केले आहे. त्यापैकी 14857 लोकांना होम क्वारनटाईन बाहेर काढले तर 2019 नागरिकांवर अजूनही आरोग्य प्रशासन घरी पाळत ठेवून आहे. आतापर्यंत 158 संशयित रुग्णांपैकी 151जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.

वर्धा जिल्ह्याच्या बाजूच्या नागपूर, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढल्याने वर्ध्याच्या जिल्हा प्रशासनाने सध्या संचारबंदी कठोर केली आहे. जिल्ह्याच्या चेकपोस्टवर 10 आरोग्य पथकांमार्फत जीवनाश्यक वस्तूच्या गाडीच्या ड्रायवर यांची तपासणी आणि भाजी विक्रेत्याची देखील आरोग्य चाचणी केली गेली. एवढंच नव्हे तर जिल्ह्यात बाहेर जिल्ह्यातील वाहतूक आणि भाजीपाला वाहतूक बंद करण्यात आली. सोबतच जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेऊन येणाऱ्या वाहनांना सीमेवर निर्जंतुकीकरण केलं जात आहे.
जिल्ह्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली आहे. मात्र ज्या नागरिकांकडून आदेशाचे उल्लंघन केलं जात आहे, त्यांच्याकरिता कठोर पावले उचलली जात आहेत.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

1) सार्वजनिक स्थळी थुंकणे पहिल्यांदा आढळल्यास ५०० रुपये दंड ,दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई

2)सार्वजनिक स्थळी मास्क न वापरणे पहिल्यांदा आढळल्यास २०० रुपये दंड ,दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई

3) दुकानदारांकडून सोशल डिस्टनसिंगचा उल्लंघन करणे यात ग्राहकास २०० रुपये तर व्यापाऱ्याला १००० रुपये दंड दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई

4) किराणा, जीवनावश्यक वस्तूंचे विक्रेत्यांची दरपत्रक न लावणे पहिल्यांदा आढळल्यास ५०० रुपये दंड ,दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी कारवाई