जिवंतपणी वेगळे मात्र एकत्र मरण, पती-पत्नीची अनोखी कहाणी

| Updated on: Nov 21, 2019 | 8:13 PM

पती-पत्नीच्या निस्सीम प्रेमाची अनुभूती भंडाऱ्यातील गावकऱ्यांना पाहायला मिळाली. एका शुल्लक कारणावरुन पंधरा वर्षापासून वेगळे राहत असलेल्या पत्नीच्या मृत्यूची (Bhandara husband-wife death) बातमी ऐकून पतीनेही आपले प्राण सोडले.

जिवंतपणी वेगळे मात्र एकत्र मरण, पती-पत्नीची अनोखी कहाणी
Follow us on

भंडारा : पती-पत्नीच्या निस्सीम प्रेमाची अनुभूती भंडाऱ्यातील गावकऱ्यांना पाहायला मिळाली. एका शुल्लक कारणावरुन पंधरा वर्षापासून वेगळे राहत असलेल्या पत्नीच्या मृत्यूची (Bhandara husband-wife death) बातमी ऐकून पतीनेही आपले प्राण सोडले. ही घटना तमुसरे तालुक्यातील चांदपूर गावातील घटना आहे. शंकर तमुसरे (47) आणि लच्छुबाई तुमसरे (40) अशी मृत पती-पत्नींची (Bhandara husband-wife death) नावं आहेत.

जिवंतपणी वेगळे झालेल्या दोघांनाही मृत्यूने एकत्रित आणले. दोघांचीही एकत्रित अंत्ययात्रा काढून अग्नी दिला. यावेळी उपस्थित नातेवाईक आणि गावकरीही गहिवरले होते.

बपेरा गावातील लच्छुबाई यांच्याशी पंचवीस वर्षापूर्वी शंकर तुमसरे यांनी लग्न केले होते. या दाम्पत्याला एका मुलगा आणि मुलगी झाली. त्यानंतर एका शुल्लक कारणावरुन दोघांमध्ये भांडण झाले. त्यामुळे लच्छुबाई माहेरी निघून गेल्या. मागील पंधरा वर्षापासून त्या माहेरीच राहत होत्या. शंकर तुमसरे हे पत्नीला आणि मुलांना भेटण्यासाठी अधूनमधून जात असत. त्यांनी लच्छुबाई यांना घरी आणण्यासाठी बरेच प्रयत्नही केले. मात्र लच्छुबाई यांनी माहेरीच राहणे पसंत केले.

लच्छुबाई यांच्या मृत्यूची बातमी काल (20 नोव्हेंबर) शंकर तुमसरे यांना मिळाली. पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळताच पत्नीवर अपार प्रेम करणाऱ्या शंकर यांना धक्का बसला आणि त्यांनी आपले प्राण सोडले. ही बातमी वाऱ्यासारखी दोन्ही गावात पसरली. त्यानंतर सर्वांनी या दोघांची अंत्ययात्रा एकत्रित काढण्याचे ठरवले.

लच्छुबाई यांना 15 वर्षानंतर पुन्हा सासरी आणल्याने दोघांचीही सामूहिक अंत्ययात्रा काढली गेली. अंत्ययात्रेत उपस्थित नातेवाईक आणि गावकऱ्यांनी पती-पत्नीच्या खऱ्या प्रमाचे प्रतीक ठरलेल्या या जोडप्याला मोठ्या करुण अंतकरणाने शेवटचा निरोप दिला. पती-पत्नी कितीही भांडत असले तरी त्यांच्यातील प्रेम कधी कमी होत नाही हेच या घटनेमुळे पुन्हा निश्चित झाले आहे.