सेवाग्राममध्ये जगातील सर्वांत उंच चरख्यासह 161 कोटींची कामं पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण होणार

| Updated on: Oct 01, 2020 | 5:55 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त वर्धा, सेवाग्राम आणि पवनार येथे विविध विकास कामांचं शुक्रवारी (2 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई -लोकार्पण होणार आहे (Inauguration of 161 Crore development work in Sevagram).

सेवाग्राममध्ये जगातील सर्वांत उंच चरख्यासह 161 कोटींची कामं पूर्ण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई लोकार्पण होणार
Follow us on

वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त वर्धा, सेवाग्राम आणि पवनार येथील विविध विकास आणि सौंदर्यकरणाच्या कामांचे शुक्रवारी (2 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई -लोकार्पण होणार आहे (Inauguration of 161 Crore development work in Sevagram). सेवाग्राम विकास आराखडया अंतर्गत ही सर्व कामं करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार हेही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता सेवाग्राम येथील महात्मा गांधी आर्युविज्ञान महाविद्यालयाच्या नविन सभागृहात हा कार्यक्रम पार पडेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित आसन व्यवस्था असल्यामुळे निमंत्रण पत्रिका असलेल्या मान्यवरांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत वर्धा सेवाग्राम रोडवर चरखागृह तयार करण्यात आले आहे. येथे 1 हजार आसन क्षमतेचे सुसज्ज असे चरखा सभागृह बांधण्यात आले . सोबतच विशेष कार्यक्रमांच्या आयोजनासाठी ओपन एअर स्टेजची निर्मिती करण्यात आली. चरख्याचे महत्व आणि विविध प्रकार सांगणारे चरखा संग्रहालय साकारण्यात आले.

जगातील सर्वांत उंच चरख्याची उभारणी

चरखागृहात जगातील सर्वांत उंच म्हणजे 18.5 फुट उंचीच्या चरख्याची उभारणी करण्यात आली आहे. सभागृहाची शोभा वाढवण्यासाठी जगातील पहिलेच आणि भारतातील एकमेव अशा महात्मा गांधींचे 31 फूट आणि विनोबा भावे यांचे 19 फूट उंचीचे स्क्रॅपपासून व्यक्तीचित्र उभारण्यात आले आहे.

सेवाग्राम आश्रम परिसरात पर्यंटकांना राहण्याची सुविधा व्हावी यासाठी 76 व्यक्ती क्षमतेचे यात्री निवास, सुसज्ज डॉरमेट्री, सेवाग्राम आश्रमाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. पर्यंटकांची 300 चारचाकी वाहने उभी राहू शकतील असे वाहनतळा सोबतच महिला आणि पुरुषांसाठी प्राथमिक सुविधा केंद्र तयार करण्यात आले.

विनोबा भावे यांच्या पवनार येथील परिसरात धाम नदीच्या तीरावरील सौदर्यकरण करुन दक्षिणेकडील भागात नागरिकांना नदीवर मूर्ती विर्सजन करण्यासाठी 1 लाख लिटर पाण्याची क्षमता असलेले डोळ्याच्या आकाराच्या कुंडाची निर्मिती करण्यात आली. वर्धा शहरातील महात्मा गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, झाशीराणी चौक, विश्रामगृहचौक , सेवाग्राम मेडिकल कॉलेज चौक, इत्यादी 9 चौकांमध्ये ऐतिहासिक घटना दर्शविणारे शिल्प निर्मिती करुन विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

या चौकातील रोषणाई रात्रीच्या वेळेला शहराच्या सौंदर्यात भर घालते. वर्धा शहरातल्या ऐतिहासिक वास्तूंना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांचे बांधकाम सौंदर्यीकरण आणि पादचारी रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच महत्वाच्या रस्त्याचे सिमेंटीकरणाचे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या इतर पायाभुत सुविधांची कामे सुध्दा सुरु आहेत.

रस्त्यावर विक्रीसाठी उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांना हक्काचे विक्री ठिकाण मिळावे यासाठी हाकर्स प्लाझाची निर्मिती करण्यात आली आहे. वर्धा शहरात येणाऱ्या पर्यंटकांचे स्वागत करण्यासाठी दत्तपूर येथे प्रवेश व्दारावर वर्धा शहराची ओळख असणाऱ्या निळकंठ पक्षाचे भव्य स्क्रॅप शिल्प उभारण्यात आले आहे.

हेही वाचा :

गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम आश्रमात पोलीस अलर्ट, बॉम्ब शोधक पथकाकडून कसून तपासणी

सेवाग्राम आश्रम पाच महिन्यांपासून पर्यटकांसाठी बंद, लॉकडाऊनमध्ये 40 लाखांचा फटका

Bhagat Singh Koshyari | स्वच्छता, स्वदेशी, स्वभाषा आणि आत्मनिर्भर भारत हे बापूंचे स्वप्न : राज्यपाल

Inauguration of 161 Crore development work in Sevagram by CM Uddhav Thackeray