भारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन, रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना ऑक्सिजन, पाणी आणि जेवण

| Updated on: Sep 05, 2020 | 3:57 PM

भारतीय सैनिकांनी सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना मदत करुन माणुसकीचं दर्शन घडवलं आहे (Indian Army rescues chinese citizens in North Sikkim).

भारतीय जवानांकडून माणुसकीचं दर्शन, रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना ऑक्सिजन, पाणी आणि जेवण
Follow us on

लडाख : सीमावादावरुन भारत आणि चीन दोन्ही देशांमधील संबंध सध्या प्रचंड ताणले गेले आहेत. चीनने आता कोणतीही कुरापत केली तर भारतीय सैन्य त्या कुरापतीला सडेतोड प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी सीमेवर रस्ता भरकटलेल्या चिनी नागरिकांना मदत करुन माणुसकीचं दर्शन घडवलं आहे (Indian Army rescues chinese citizens in North Sikkim).

भारतीय सैनिकांनी सीमेवर रस्ता भरकटलेल्या तीन चिनी नागरिकांचे प्राण वाचवले आहे. हे तीनही जण 17 हजार 500 फूट उंच उत्तर सिक्कीम पठार क्षेत्रात शुन्य अंश सेल्सिअस तापमान असलेल्या वातावरणात अडकले होते. त्यांना आपला रस्ता मिळत नव्हता. नेमकं जायचं कुठे? असा प्रश्न त्यांना पडला होता.

यादरम्यान भारतीय जवानांना चिनी नागरिकांची गाडी दिसली. या गाडीत दोन पुरुष आणि एक महिला होती. चिनी नागरिकांचे हाल, खटाटोप जवानांच्या निदर्शनास आली. भारतीय जवानांनी वेळेचा विलंब न करता तातडीने चिनी नागरिकांना मदत केली (Indian Army rescues chinese citizens in North Sikkim).

भारतीय सैनिकांनी तीनही चिनी नागरिकांना सर्वात आधी ऑक्सिजन दिलं. त्यानंतर जेवण आणि गरम कपडे दिले. त्याचबरोबर इतर महत्त्वपूर्ण वस्तूही दिल्या. भारतीय जवानांनी केलेल्या मदतीने चिनी नागरिक भावूक झाले. त्यांनी भारतीय जवानांचे आभार मानले. त्यानंतर जवानांनी चिनी नागरिकांना योग्य मार्ग दाखवत चीनच्या दिशेला रवानगी केली.

काही दिवसांपूर्वी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये मोठी झडप झाली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात पुन्हा चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले. चीनच्या अशा वागणुकीमुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. दरम्यान, दोन्ही देशांकडून चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी (4 सप्टेंबर) भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती असताना भारतीय जवानांनी सीमेवर भरकटलेल्या चिनी नागरिकांना केलेली मदत कौतुकास्पद आहे.

संबंधित बातमी :

LAC वरच्या सैनिकांचा आत्मविश्वास हिमालयाएवढा; फक्त आदेशाची गरज : लष्करप्रमुख नरवणे