कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांनी हायवेवर चूल मांडली, पुणे-बंगळुरु हायवेवरच ठिय्या

| Updated on: Dec 20, 2019 | 1:06 PM

कोल्हापुरात पुणे-बंगळुरु महामार्गावर चूल मांडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांनी हायवेवर चूल मांडली, पुणे-बंगळुरु हायवेवरच ठिय्या
Follow us on

कोल्हापूर : पूरग्रस्तांना योग्य मदत मिळावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील महिलांनी पुणे-बंगळुरु महामार्गावर आंदोलन केलं. हायवेवर चूल मांडून महिलांनी पूरग्रस्तांना (Kolhapur Flood affected women protest) न्याय देण्याची मागणी केली. महिलांनी अक्षरशः संसार थाटत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

पूरग्रस्तांना अपेक्षित मदत मिळाली पाहिजे, महिलांनी उद्योगासाठी घेतलेली कर्ज माफ करा, यासह अन्य मागण्यांसाठी छत्रपती शासन संघटनेच्या वतीने गनिमी कावा लढवून आंदोलन करण्यात आलं. महामार्गावर चूल मांडून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनामुळे पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलक महिलांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.

यंदाच्या पावसाळ्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मुंबईसह राज्यातील 29 जिल्ह्यांना महापूर आणि अतिवृष्टीचा फटका बसला होता. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे कोल्हापुरात जनजीवन ठप्प झालं होतं.

पुणे-बंगळुरु महामार्गासोबतच कोल्हापूरच्या इतर रस्त्यांवरही पुराचं पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-बंगळुरु महामार्गावर यादरम्यान 16-18 हजार वाहनं थांबून होती. इतर रस्त्यांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून होत्या. पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपूर्ण वाहतूक बंद पडली होती.

Kolhapur Flood affected women protest