राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत कर्जमाफी, सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा

| Updated on: Jul 02, 2020 | 6:23 PM

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे (Loan Waiver to Farmers of Maharashtra).

राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकऱ्यांना जुलैअखेरपर्यंत कर्जमाफी, सहकार मंत्र्यांची मोठी घोषणा
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे (Loan Waiver to Farmers of Maharashtra). जुलैअखेरपर्यंत राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याची घोषणा केली. निधी अभावी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली होती. यामुळे 11 लाख 12 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफी रखडली होती. आता याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, “कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या राज्यातील सव्वाअकरा लाख शेतकर्‍यांना जुलै अखेपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी निधी अभावी ठप्प झाली होती. त्यामुळे राज्यातील 11.12 लाख शेतकर्‍यांची कर्जमाफी होऊ शकली नाही. राज्य सरकारने अशा शेतकऱ्यांना पिक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बँकांना दिल्या होत्या. मात्र हे शेतकरी आपली कर्जमाफी कधी होणार याची वाट बघत होते. आता राज्याच्या सहकार विभागाने या शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै अखेपर्यंत या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल.”

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची रक्कम वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जुलै अखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल, असं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, “शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-19 चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-19 चा प्राद्रुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला.”

“सध्या खरीप परेणीचा हंगाम सुरू झाला आहे. तिसऱ्या यादीतील राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी 2 हजार कोटी रक्कम वर्ग करण्यात आली आहे. जुलै अखेरपर्यंत सव्वा आकरा लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 8 हजार 200 कोटी रुपये रक्कम वर्ग करण्यात येणार आहे,” अशी माहिती पाटील यांनी दिली.

ज्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा अद्याप लाभ मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया पूर्ण करुन घ्यावी, असंही आवाहन सहकार मंत्र्यांनी केलं आहे.

दरम्यान कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या मात्र कोविड-19 च्या संकटामुळे कर्जमुक्तीचा लाभ न मिळालेल्या कर्जदार शेतकऱ्यांना खरीप कर्ज द्यावे अशा सूचनाही शासनाने बँकांना दिल्या होत्या असं पाटील यांनी यावेळी सांगितलं.

जुलैअखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे. सरकारच्या या निर्णयाने कर्जमाफीपासून वंचित असणाऱ्या जवळपास 11 लाख 12 हजार शेतकर्‍यांची कर्जमाफीची वाट सुकर झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन आणि बंद झालेले उद्योगधंदे यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही झाला आहे. मात्र, सरकारने अशा स्थितीतही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला प्राधान्य दिलं आहे. यामुळे लाखो शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा काही प्रमाणात का होईना हलका होणार आहे.

हेही वाचा :

Akola Janta Curfew | अकोटमध्ये 3 ते 9 जुलैपर्यंत ‘जनता कर्फ्यू’, नागरिकांनी सहकार्य करावं, बच्चू कडू यांचं आवाहन

कोरोना नियंत्रणासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स, अमित देशमुखांची घोषणा

चौथीची पोरगी सांगेल, यांचं काही खरं नाही, फडणवीसांनी दोन तासात प्रश्न सोडवले असते : चंद्रकांत पाटील

Loan Waiver to Farmers of Maharashtra