‘इकडे ‘चला हवा येऊ द्या’ आधीपासूनच, मी ‘मिसेस मुख्यमंत्र्यां’चं ऐकतो, तुम्ही ‘होम मिनिस्टर’चं ऐका’

| Updated on: Mar 25, 2020 | 1:19 PM

कोरोनामुळे कुटुंबीय एकत्र येत आहेत, आपापले छंद जोपासत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. गमावलेले सर्व मिळविण्याचा प्रयत्न होत आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या (Uddhav Thackeray Gudhipadwa Wishes)

इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं  ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. घरातील एसी बंद ठेवा, कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करु नका, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका, अशा हलक्याफुलक्या गप्पाही मुख्यमंत्र्यांनी मारल्या. (Uddhav Thackeray Gudhipadwa Wishes)

सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, आज मी तुम्हाला निगेटिव्ह काहीच सांगण्यासाठी आलेलो नाही, मी केवळ शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. काल रात्री थोडी धावपळ झाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गप्पा सुरु केल्या.

एकूणच सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. 1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहील पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

या निमित्ताने का होईना ना, कोरोनामुळे कुटुंबीय एकत्र येत आहेत, आपापले छंद जोपासत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. गमावलेले सर्व मिळविण्याचा प्रयत्न होत आहे, अशा भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. (Uddhav Thackeray Gudhipadwa Wishes)

केंद्र सरकार एसी बंद करण्याचा सल्ला देत आहे, आम्ही ते आधीच केले आहेत, इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे. लोकं मला विचारतात, मी सांगतो, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.

कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचे खाद्यपदार्थांचा साठा करु नका, रुग्णालये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालूच राहतील. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली.

जीवनावश्यक कामे सुरुच राहतील, भाजीपाला बंद होणार नाही, त्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. भाजी आणण्यासाठी एकट्यानेच जा, अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडू नका. शेती मालाची वाहतूक, शेतीची काम सुरू राहील. फक्त गरजेपुरते बंद ठेवा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. कोरोनाविरुद्धची लढाई सुरुच ठेऊ, हे युद्ध आपल्याला जिंकायचंच आहे. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात बहर येते, परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर पुन्हा आनंदाने गुढीपाडवा साजरा करु, असा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (Uddhav Thackeray Gudhipadwa Wishes)