मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन

| Updated on: Oct 31, 2020 | 8:49 PM

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. त्याबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये, असं सांगत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन
Follow us on

मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा घाट घातला असून काही मराठा नेत्यांनी त्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणायला सुरुवात केल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे. तसेच मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशाला विरोध म्हणून मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला असतानाच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही. त्याबाबत कोणीही गैरसमज पसरवू नये, असं सांगत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (maratha quota will not merge in obc reservation)

ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाच्या ओबीसीकरणाला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधत हा खुलासा केला. मराठा समाजास स्वतंत्र आरक्षण देण्यात येत आहे आणि सर्वोच्च न्यायालयात ते टिकवण्यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. दुसऱ्या कोणत्याही समाजाच्या आरक्षणात मराठा समाजाचे आरक्षण सामील करण्याचा कोणताही प्रस्ताव किंवा विचार नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवले जाऊ नयेत, असं जयंत पाटील यांनी सांगून गेल्या काही दिवसांपासून दोन्ही समाजत सुरू असलेल्या संभ्रमावर पडदा टाकला.

शेंडगे काय म्हणाले?

प्रकाश शेंडगे यांनी मराठा आरक्षण तसंच नोकरभरती संदर्भात पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी मराठा नेते आणि संघटनांवर त्यांनी जोरदार टीका केली. मराठा समाजातील काही संघटना, नेतेमंडळी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे, अशी मागणी करत आहेत. अशी मागणी करुन हे नेते महाराष्ट्रातलं सामाजिक सलोख्याचं वातावरण बिघडवण्याचं काम करत आहेत, असा घणाघात शेंडगे यांनी केला.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा कोणताही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पारित करु नये. जर सरकारने तसा प्रस्ताव पारित करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यासंबंधी काही पावले उचलली तर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आक्रोश होईल, असं ते म्हणाले.

ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवण्याचं षडयंत्र सुरू आहे. मराठा आरक्षणाचं राजकारण होतंय. ओबीसी समाजाचं ताट खेचण्याचा प्रयत्न होतोय. ओबीसी आरक्षण बचावासाठी 3 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ठाकरे सरकारने मराठा समाजाच्या मागण्या लगोलग मान्य केल्या. सगळ्या वर्गातील मुलं नोकरभरतीची वाट पाहत असताना सरकारने एका समाजासाठी नोकर भरती थांबवली. 13 टक्के जांगांसाठी 87 टक्के जागांची अडवणूक का? असा सवाल करत मराठा समाजाच्या 13 टक्के जागा बाजूला काढून इतर प्रवर्गातील मुलांची भरती करा, असंही ते म्हणाले. (maratha quota will not merge in obc reservation)

 

संबंधित बातम्या:

मराठा समाजाकडून आरक्षणाचा खेळखंडोबा, ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध : प्रकाश शेंडगे

…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, प्रकाश शेंडगे आक्रमक

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याचा प्रयत्न झाल्यास…, प्रकाश शेंडगेंचा ठाकरे सरकारला इशारा

(maratha quota will not merge in obc reservation)