अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जाणार का? शितली म्हणते…

| Updated on: Jun 24, 2019 | 5:22 PM

‘लागिरं झालं जी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शितलीला तू बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे तिने अगदी 'शितली स्टाईल'मध्ये उत्तर दिलं आहे.

अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जाणार का? शितली म्हणते...
Follow us on

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लागिरं झालं जी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेल्या या मालिकेने नुकतंच प्रेक्षकांचा निरोप घेतला. अवघ्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 22 जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्याऐवजी आता ‘मिसेस मुख्यमंत्री’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लागिरं झालं जी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी शितली अर्थात अभिनेत्री शिवानी बावकरने टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुममध्ये मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी शितलीला तू बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये जाणार का? असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचे तिने अगदी ‘शितली स्टाईल’मध्ये उत्तर दिलं आहे.

‘लागिरं झालं जी’ ही मालिका सुरु झाल्यापासून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेत लष्करात असलेला आज्या आणि साधीसरळ शितली यांच्यात हळूवार उमलणारी प्रेमकथा महाराष्ट्रातील रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. त्यानंतर आज्या आणि शितलीचा विवाहसोहळा संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. जणू आपल्याच घरचं लग्न असल्याप्रमाणे सगळ्यांनी ते सेलिब्रेट केलं. यानंतर आज्याच्या घरात आल्यानंतर डावपेच, राग, वाद या सर्व प्रसंगांना शितलीने मोठ्या धीराने तोंड दिले. त्यातही नवरा जवळ नसताना घरातल्यांची समजून काढणे हेही एखाद्या आदर्श सूनेप्रमाणे शितलीने केले. नवरा बेपत्ता झाल्यावर पदरात मूल असतानाही आर्मीत भरती होण्याचा निर्णय घेणे यासारखे अनेक धाडसी निर्णयही ती घेते.

या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी बावकरसह, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार चांगलेच प्रकाशझोतात आले. महत्त्वाचे म्हणजे या मालिकेमुळे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना रोजगार मिळाला. गाव प्रकाशझोतात आले. पण अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबला.

मालिकेच्या शेवटच्या काही भागात शीतलच्या डोहाळ जेवणादिवशी अजिंक्य बेपत्ता होणे, तो पाकिस्तानात कैदी असणे, या प्रसंगानंतरही अजिंक्यचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्मीत जाण्याचा निर्णय घेणे आणि अखेर शेवटच्या दोन भागात अजिंक्य सापडतो. त्यानंतर अजिंक्यला भारतात परत आल्यानंतर त्याचे शीतल आर्मीच्या वर्दीमध्येच स्वागत करते. अशी एकंदर हॅप्पी एनडींग करत मालिकेचा प्रवास थांबला.

दरम्यान सध्या बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन चांगलाच रंगतो आहे. बिग बॉस मराठीबाबत शितलीलाही फार उत्सुकता आहे. यासाठी तिला आम्ही साताऱ्याला सातारा रिप्लेस करणार का, म्हणजेच साताऱ्याच्या अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जायला आवडेल का असा प्रश्न विचारला. यावेळी तिने अगदी शितली स्टाईलमध्ये प्रेक्षकांना उत्तर दिले.

त्याचं काय आहे ना, आताच माझी मालिका संपली, त्यामुळे जवळपास महिनाभर तरी मी मस्त आराम करेन, कुठे तरी लाँग वीकेंडला जाईन. त्यामुळे बिग बॉसमध्ये जाण्याचा सध्या तरी माझा कोणताही प्लॅन नाही असे शिवानीने टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीदरम्यान सांगितले.

त्याशिवाय यावेळी तिने या मालिकेचा प्रवास कसा होता, मालिकेतील गमती जमती, रिल आणि रिअल लाईफ मधील प्रवास याबाबतही बरेच सीक्रेट रिव्हल केले. मात्र मालिका संपल्यामुळे सध्या आपल्या लाडक्या आज्या-शितलीला प्रेक्षक मिस करत आहे.

दरम्यान बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी सेटवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सातारा जिल्हा न्यायलयाने चेक बाऊन्स प्रकरणात जामीन मंजूर केला होता. मात्र खंडणी प्रकरणात मात्र त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

संबंधित बातम्या : 

आज्या-शितली निरोप घेणार, ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा शेवटचा भाग ठरला!

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेची बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई