SEBC संवर्गातील पदे सोडून तलाठी पदासाठी निवड झालेल्या इतर सर्व उमेदवारांना नियुक्ती देणार : बाळासाहेब थोरात

| Updated on: Dec 02, 2020 | 6:20 PM

राज्यातील 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

SEBC संवर्गातील पदे सोडून तलाठी पदासाठी निवड झालेल्या इतर सर्व उमेदवारांना नियुक्ती देणार : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस. ई. बी. सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली (Minister Balasaheb Thorat approve appointment of Selected candidate of Talathi in Maharashtra).

बाळासाहेब थोरात म्हणाले, “7 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे सामान्य प्रशासन विभाग आणि विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानुसार 7 जिल्ह्यातील 2019 मधील तलाठी पदभरतीतील एस.ई.बी.सी. (SEBC) संवर्गातील पदे वगळता इतर निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यामुळे बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या निर्णयाबाबत कळविण्यात आले आहे.”

2019 मध्ये राज्यातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. यापूर्वी राज्यातील 26 जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. यामध्ये कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा, अमरावती विभागातील अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यांचा आणि नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होता.

औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर हे जिल्हे, नाशिक विभागातील जळगाव, नाशिक हे जिल्हे, पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यात तलाठी पदाची भरती प्रक्रिया झाली होती. औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, नांदेड, बीड, नाशिक विभागातील नंदुरबार, धुळे, अहमदनगर आणि पुणे विभागातील सोलापूर, सातारा या जिल्ह्यात तलाठी पदभरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. त्यावेळी वित्त विभागाने 4 मे 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार पदभरतीवर निर्बंध घातले होते. मात्र सदरची भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या मान्यतेनेच सुरु करण्यात आली असल्याने उर्वरित 8 जिल्हयातील निवड झालेल्या उमेदवारांच्या संदर्भात वेगळी भूमिका घेणे उचित होणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आहे.

यानुसार आता 8 जिल्ह्यातील निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्ती आदेश देण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने 9 सप्टेंबर 2020 रोजी पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांना कळवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी आदेश पारीत करुन एस.ई.बी.सी. आरक्षणास स्थगिती दिली आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्हा पेसाक्षेत्राखाली असल्याने नंदुरबार जिल्हाधिकारी यांनी 16 नोव्हेंबर 2020 रोजी नियुक्ती आदेश पारीत करण्यात आले असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

हेही वाचा :

दिल्लीत शेतकरी आंदोलनाचा ७वा दिवस, राज्यात काँग्रेस आक्रमक!, गुरुवारी प्रत्येक तालुक्यात आंदोलन छेडणार

कोरोनामुळे सरकारचा महसूल कमी, त्यामुळे सर्वांना निधी मिळत नाही; काँग्रेस नाराज नाही: बाळासाहेब थोरात

व्हिडीओ पाहा :

Minister Balasaheb Thorat approve appointment of Selected candidate of Talathi in Maharashtra