मुळशी पॅटर्न : तालुक्याची नव्हे, देशाची गोष्ट

| Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

लहानपणी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या खुराड्यातल्या कोंबड्या सोडाव्या लागायच्या… त्यांना सोडलं की दोन तीन मुठी बाजरी नाहीतर ज्वारीचे दाने त्यांच्यापुढ टाकावे लागायचे. दाने आसायचे ओंजळभर आणि खाणाऱ्या कोंबड्या मात्र जास्त… आपलं काम फक्त दाणे टाकणं, ते टाकून झाले की आपण फक्त बघत बसायचं कोंबड्या कशा एकमेकींशी झुंजत बसतात ते… अगदी त्याच दृष्यांची आठवण प्रविण तरडेंचा […]

मुळशी पॅटर्न : तालुक्याची नव्हे, देशाची गोष्ट
Follow us on

लहानपणी सकाळी झोपेतून उठल्या उठल्या खुराड्यातल्या कोंबड्या सोडाव्या लागायच्या… त्यांना सोडलं की दोन तीन मुठी बाजरी नाहीतर ज्वारीचे दाने त्यांच्यापुढ टाकावे लागायचे. दाने आसायचे ओंजळभर आणि खाणाऱ्या कोंबड्या मात्र जास्त… आपलं काम फक्त दाणे टाकणं, ते टाकून झाले की आपण फक्त बघत बसायचं कोंबड्या कशा एकमेकींशी झुंजत बसतात ते… अगदी त्याच दृष्यांची आठवण प्रविण तरडेंचा मुळशी पॅटर्न हा चित्रपट पाहताना येते…

पैसा भल्याभल्यांना वाकवतो म्हणतात ते काही खोटं नाही. तो ज्यांच्याकडे आहे त्याला सुखाने झोप येईलच असं नाही. फक्त पैसा असून चालत नाही, तर त्या पैशाचा कसा वापर करायचा याची अक्कल पण असायलाच हवी. पैसा आणि त्याच्या भोवती फिरणारी गुन्हेगारी या सगळ्यांच्या भोवती चित्रपटाची कथा फिरते.

कथेचा नायक राहुल नावाचा शेतकऱ्याचा पोरगा… गावाकडे बापाची बागायत शेतजमीन असते. पण डेव्हलपमेंटमध्ये यांच्या जमिनी बिल्डरांनी हवे तेवढे पैसे देऊन घेतल्या. ज्यांनी स्वखुशीने दिल्या त्यांच्या घेतल्या आणि ज्यांनी स्वखुशीने दिल्या नाहीत त्यांच्या नरड्यावर बसून घेतल्या. ते देण्यासाठी बिल्डरांनी परिसरातीलच गुंडांना हाताशी धरलं. या गुंडांच्या टोळीत काम करणारी पोरं दुसरी तिसरी कोणी नसून याच शेतकऱ्यांची तरणीबांड पोरं होती. शेती विकलेली, शिक्षण झालेलं नाही, मग करायचं काय हा प्रश्न… म्हणून अशी कित्येक गावची गावं आपली शेती-वाडी सगळं सोडून शहरांकडे स्थलांतरीत होऊ लागली… आणि हाताला मिळेल ते काम करु लागली.

राहुल्याचं कुटुंबही असंच गाव सोडून पुण्यात स्थलांतरीत झालेलं. बापासोबत राहुल्यापण मार्केट यार्डमध्ये हमाली करत असतो. पण शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापाऱ्याचा पहिला खुन तो मार्केटमध्ये करतो आणि येथूनच खऱ्या अर्थाने त्याच्या गुन्हेगारीला सुरूवात होते.

पुढे जेलमध्ये गेल्यानंतर त्याला नन्या भाई नावाचा मोठा गुन्हेगार भेटतो, तो त्याला जेलमधून सोडवतो आणि राहुल्या त्याच्या टोळीचा अधिकृत मेंबर बनतो. पुढे हाच राहुल्या टोळीचा म्होरक्या कसा बनतो, यांना त्रास देणाऱ्या सगळ्यांचा बदला कसा घेतो, गुन्हेगारीचं हे वर्तुळ नेमकं कसं आहे, या सगळ्यांवर लक्ष ठेऊन असणारे पोलीस नेमकं कशा पध्दतीने काम करतात हे सगळं चित्रपटात पाहायला मिळतं. ते सगळं अनुभवण्यासाठी तुम्ही थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की पाहायला हवा…

चित्रपटाची कथा ही 1990-91 च्या आसपासची आहे… चित्रपटात जरी पुणे आणि आसपासचा परिसर दाखवला असला तरी ही कथा जिथे आता मोठमोठाल्या कंपन्या उभ्या आहेत, त्या गावांची आहे असं चित्रपट पाहताना वाटतं. चित्रपटाची कथा नॉन लिनीअर पद्धतीने सांगितलीय, त्यामुळे आता पुढे काय याची उत्सुकता चित्रपट पाहताना सतत लागून रहाते.

कथेसोबतच अभिनय हा चित्रपटाचा प्लस पॉईंट आहे. राहुल्याची भूमिका साकारणाऱ्या ओम भुतकरच्या अभिनयाला तोड नाही. त्यासोबतच मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, सुरेश विश्वकर्मा, मालविका गायकवाड, शरद जाधव यांचाही अभिनय उत्तमच. गण्या भाई, पिट्या भाई, दया ही पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. सर्वच अंगांनी अभिनयाच्या बाबतीत चित्रपट उत्कृष्ट ठरतोय.

कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनासोबतच अभिनयाची धुराही प्रविण तरडेंनी लिलया पेललीय. तरडेंचा अभिनय हा चित्रपटाच्या पूर्वार्धात जरी येत असला तरी तेवढ्या वेळातच ते त्यांच्या अभिनयाची छाप पाडून जातात. चित्रपटाचं चित्रीकरण हे बऱ्याच अंशी आऊटडोअरला झालंय… ते सगळं महेश लिमयेंनी आपल्या कॅमेऱ्यातून उत्कृष्ट टिपलंय. सध्या लोकप्रिय असलेला “भाईचा बड्डे, खतरनाक” आणि आभाळाला ही गाणी चित्रपटात आहेत. प्रसंगानुरूप येणाऱ्या आभाळाला या गाण्याची कडवी, त्यातील शब्द त्या-त्या ठिकाणी विचार करायला लावणारी सोबतच बरंच काही सांगणारी आहेत.

एकंदीरीच अॅक्शन, गुन्हेगारांचं जग, त्याकाळात जमिनी विकल्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं विस्थापन, त्यांच्याच उरावर बसून जमिनी बळकावणारे बिल्डर, राजकारणी आणि या सगळ्यावर बारीक लक्ष ठेवून असणारी पोलिसांची खाकी वर्दी हे सगळं दिग्दर्शकाने जबरदस्त पद्धतीने मांडलय…

चित्रपट संपल्यावर एक मित्र म्हणत होता “फँड्रीतला दगड जेवढा प्रेक्षकांच्या डोक्यात लागतो तेवढ्याच जोरात मुळशी पॅटर्नची शेवटची कानफडात लागते…” अगदी खरंय ते… संपूर्ण कुटुंबासमवेत चित्रपटगृहात जाऊन पाहावा असाच हा सिनेमा आहे.

प्रमोद जगताप

सिनेमाचा ट्रेलर