मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती

| Updated on: Oct 02, 2020 | 5:22 PM

शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इनस्टिट्यूटला दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरु झाली.

मी आणि माझ्या स्टाफने आज लस घेतली, सीरम इन्स्टिट्यूटच्या भेटीनंतर शरद पवारांची माहिती
Follow us on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यावेळी शरद पवारांनी तिथे तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस घेतल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (My staff and I got vaccinated today, Says Sharad pawar after visiting Serum Institute pune)

शरद पवार यांनी सांगितले की, मी कोरोनावरील लस घेतली असे लोक म्हणत आहेत, परंतु ते खरं नाही, त्यांच्याकडे (सीरम इन्स्टिट्यूट) आत्ता रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी (आरबीसीजी ट्रिपल बुस्टर) लस आहे. ती लस आज मी घेतली आहे. माझ्यासोबत माझ्या स्टाफनेदेखील ही लस घेतली आहे. सीरम इन्स्टिट्यूटची कोरोनावरील लस यायला जानेवारी उजाडेल.

या भेटीत पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीच्या कामाची माहिती घेतली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे. एक ऑगस्टला देखील शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये येऊन कोरोनावरील लस बनवण्याचं काम कसं सुरु आहे? याची माहिती घेतली होती.

हाथरस प्रकरणाचा शरद पवारांकडून निषेध

दरम्यान या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हाथरस येथील घटना आणि उत्तर प्रदेश पोलिसांवर संताप व्यक्त केला. पवार म्हणाले की, हाथरस येथील घटनेतील पीडित तरुणीच्या मृतदेहाची उत्तर प्रदेश पोलिसांनी परस्पर विल्हेवाट लावली. असा प्रकार देशात कधीच घडला नाही. उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या कृत्याचा देशभरातून संताप उमटलेला असून जनतेची रिअॅक्शन योग्यच आहे.

पवार म्हणाले की, उत्तर प्रदेश पोलिसांनी कायदा हातात घेऊन टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. माणूसकीच्या दृष्टीकोनातूनही पोलिसांनी असं वागायला नको होतं. त्यामुळे देशातील जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून जनतेची रिअॅक्शन ही योग्यच आहे.

उत्तर प्रदेश सरकारने त्या मुलीचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांना का दिला नाही? पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटायला जाणाऱ्या नेत्यांची तुम्ही अडवणूक का करता?, याचाच अर्थ उत्तर प्रदेशात कायद्याचं राज्य आणि मूलभूत अधिकार याला काही अर्थ राहिला नाही. महाराष्ट्रात अशा घटना घडल्यावर तात्काळ अॅक्शन घेतली जाते. पण उत्तर प्रदेशात लागोपाठ दोन घटना घडल्यानंतरही काहीच कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असा होतो, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या 

पंतप्रधान बोलत का नाहीत?; जनतेला हाथरसच्या घटनेचं सत्य सांगा; शिवसेनेची मागणी

देशात अराजक माजलंय; सरकारने चूक कबूल करावी; सुप्रिया सुळेंनी सुनावलं

(My staff and I got vaccinated today, Says Sharad pawar after visiting Serum Institute pune)