नागपूरच्या लोकप्रतिनिधींना ‘इगो’ची लागण, कोरोनाकाळातही राजकारण

| Updated on: Jul 31, 2020 | 2:19 PM

नागपूरमधील राजकारणी आपला हट्ट सोडून एकत्र येताना दिसत नाहीत. उलट एकमेकांच्या 'इगो'चा प्रश्न असल्याचं इथे दिसून येत आहे. (Nagpur lockdown meeting)

नागपूरच्या लोकप्रतिनिधींना इगोची लागण, कोरोनाकाळातही राजकारण
Follow us on

नागपूर : नागपूरमधील कोरोना रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहे, त्यामध्ये राजकीय मतभेद असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. लोक कोरोनाने मरत असताना, नागपूरमधील राजकारणी आपला हट्ट सोडून एकत्र येताना दिसत नाहीत. उलट एकमेकांच्या ‘इगो’चा प्रश्न असल्याचं इथे दिसून येत आहे. (Nagpur lockdown meeting)

नागपूरमधील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी आज महापौर संदीप जोशी यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनपा आयुक्तांसह प्रशासन, पोलीस अधिकाऱ्यांना निमंत्रण आहे. मात्र त्याचवेळी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनीही आज बैठक बोलावली असून, या बैठकीलाही त्याच अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. गोम म्हणजे दोन्ही बैठका दोन वेगवेगळ्या ठिकाणी पण समान वेळेला आहेत. त्यामुळे नेमकं कोणत्या बैठकीला हजेरी लावायची असा संभ्रम अधिकाऱ्यांसमोर आहे. (Nagpur lockdown meeting)

महापौर आणि पालकमंत्री दोन्ही बैठकीचं मनपा आयुक्त, विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना निमंत्रण आहे. अधिकारी नेमके कुणाच्या बैठकीत जाणार याबाबत मात्र संभ्रम आहे. दोन्ही बैठकांचा वेळ 12 वाजताची आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, लॉकडाऊन करायचा की नाही, करायचा असेल तर तो कसा करायचा, करायचा नसेल तर अन्य पर्याय काय, याबाबतची चर्चा सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र करणे अपेक्षित आहे. मात्र नागपूरमध्ये राजकारणी आपआपला इगो सांभाळण्यात मश्गुल असल्याचं दिसत आहे.

महापौर संदीप जोशी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

  • या शहरात लॉकडाऊन नको म्हणजे नको असं बैठकीत ठरलं असून जनप्रतिनिधींनी लॉकडाऊनला विरोध केला. लॉकडाऊन जबरदस्तीने केल्यास जनप्रतिनिधी रस्त्यावर उतरतील
  • लॉकडाऊन संदर्भात जनप्रतिनिधींची बैठक झाली मात्र दुर्दैवाने पालकमंत्र्यांनी आजच बैठक ठेवली. जेव्हा की आमची बैठक आधीच ठरली होती
  • या परिस्थितीत वातावरण चुकीचं आणि घाणेरडं राजकारण आहे. शहराची जबाबदारी आयुक्त यांच्याकडे असताना आयुक्त बैठकीला हजर नाही हे घाणेरडं चित्र आहे
  • यावर जनप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. ऑड-इव्हन सुरु असताना मोठ्या रस्त्यावरील दोन्ही बाजूची दुकाने सुरू असावी
  • 6 मीटरच्या रस्त्यावरील दुकानांसाठी ऑड इव्हनचा फॉर्म्युला लावण्यात यावा
  • हायकोर्टचे आदेश असेल तरच अतिक्रमण काढण्यात यावं. कारण नागरिक फार अडचणीत आहे
  • मूर्तीकारांवर 5 हजार दंड घेतला जात आहे ते बंद करावा असा निर्णय जनप्रतिनिधींनी घेतला
  • ज्यांना हॉटेलमध्ये क्वारान्टीन केलं जातं त्यांना 14 दिवस ठेवलं जातं यात काही साटंलोटं आहे का ?
  • 7 तारखेला आणखी बैठक घेतली जाईल.
  • आयुक्तांनी महापौरांच्या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाही हे सुद्धा सांगितलं नाही

महापौरांची बैठक

महापौर संदीप जोशी यांनी यापूर्वीही म्हणजेच 24 जुलैला सर्व प्रशासकीय यंत्रणांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे दोघेही उपस्थित होते. मागील काही दिवसांमधील संघर्षानंतर पहिल्यांदाच ते एकत्र आले. लॉकडाऊन हा अंतिम निर्णय असू शकत नाही. 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पुन्हा याबाबत बैठक होणार आहे. 31 जुलैपर्यंत जनतेनं नियम पाळले नाही, तर 31 जुलैच्या बैठकीत लॉकडाऊनबाबत चर्चा होईल,” असं त्यावेळी महापौर संदीप जोशी यांनी नमूद केलं होतं.

त्यानुसार 31 जुलैची बैठक नियोजित होती. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनीही आज दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली आहे.

पालकमंत्र्यांची बैठक

दरम्यान, नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनीही आज दुपारी 12 वाजता बैठक बोलावली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत आहे. पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक बोलावली आहे. जिल्हा लॉकडाऊन करायचा असेल तर पालकमंत्र्यांना अधिकार आहेत. मग त्यांच्या उपस्थितीत या बैठका आवश्यक आहेत. मात्र स्थानिक प्रशासन रस्त्यावर उतरुन परिस्थिती हाताळत आहेत. त्यामुळे महापौर हे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अधिकाऱ्यांना घेऊन बैठका घेत आहेत. पण त्यांनी पालकमंत्र्यांशी संवाद साधलाय का? पालकमंत्र्यांनी महापौरांशी संपर्क केलाय का? असे प्रश्न आहेत.

नागपूर महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकारम मुंढे यांचा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. त्यातच नागपूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसकडे म्हणजेच नितीन राऊत यांच्याकडे आहे. नागपूरमधील सध्याची राजकीय स्थिती असताना, तिकडे कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अशा परिस्थितीतही राजकारण्यांचा इगोच जास्त वाढत असल्याचं दिसतंय.

संबंधित बातम्या 

संघर्षानंतर नागपूरचे महापौर-आयुक्त पहिल्यांदाच एकत्र, दोन दिवस जनता कर्फ्यू, 4 दिवस लोकप्रतिनिधी रस्त्यावर