महाराष्ट्रात ‘लव जिहाद’ची प्रकरणं वाढल्याचं ट्विट, टीकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण

| Updated on: Oct 21, 2020 | 7:12 PM

महाराष्ट्रात 'लव जिहाद'ची प्रकरणं वाढल्याचं ट्विटनंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

महाराष्ट्रात लव जिहादची प्रकरणं वाढल्याचं ट्विट, टीकेनंतर महिला आयोगाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण
Follow us on

नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) अध्यक्ष रेखा शर्मा (Rekha Sharma) यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची मंगळवारी (20 ऑक्टोबर) भेट घेतली. यानंतर त्यांनी राज्यपालांसोबतच्या एका फोटोसोबत भेटीचं कारण सांगितलं. यात त्यांनी महाराष्ट्रातील वाढत्या लव जिहादच्या घटनांवरही चर्चा केल्याचं म्हटलं. यानंतर एकच वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. तसेच त्यांना महिला आयोगाच्या पदावरुन हटवण्याचीही मागणी झाली. यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे (NCW chief Rekha Sharma explaination over Love Jihad remark and row Twitter).

महिला आयोगाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेखा शर्मा यांनी दावा केलाय की मागील काही काळात महाराष्ट्रात ‘लव जिहाद’च्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यांनी परस्पर संमतीने आंतरधर्मीय लग्न आणि ‘लव जिहाद’मधील अंतर अधोरेखीत करत हा मुद्दा राज्यपालांच्या लक्षात आणून दिला. मात्र, यावर वाद वाढताना दिसल्यानंतर रेखा शर्मा म्हणाल्या, ‘मी या मुद्द्यावर ट्विटरकडे तक्रार केली आहे. माझ्या अकाऊंटवर काही संशयास्पद गोष्टी होत आहेत. याचा तपास सुरु आहे. मी ट्रोल करणाऱ्यांना उत्तर देणार नाही.’

महिला आयोगाच्या ट्विटर हँडलवरुन रेखा शर्मा आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा एक फोटो शेअर करण्यात आलाय. याच्या कॅप्शनमध्ये ‘लव जिहाद’ शब्दप्रयोग करण्यात आला आहे. उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून वारंवार ‘लव जिहाद’ शब्दाचा वापर होत आला आहे. यानुसार हिंदू महिलांना जबरदस्तीने किंवा फसवून धर्मांतरण करत लग्न करण्यात येत असल्याचा आरोप संबंधित संघटनांकडून करण्यात येतो.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी राज्यपालांच्या भेटीदरम्यान याच लव जिहादच्या मुद्द्यावरही चर्चा केली. तसेच महाराष्ट्रात महिला आयोगला अध्यक्ष नसल्याने जवळपास 4,000 तक्रारींवर कारवाई झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं. रेखा शर्मा यांनी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर ‘दिशा कायद्या’प्रमाणे कायदा तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच महिलांविरोधातील गुन्ह्यांचे खटले लवकर पूर्ण करुन कडक शिक्षेची तरतूद करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

तनिष्क वाद: जाराकडून राहुलसोबतच्या लग्नाचा फोटो ट्विट, शशी थरुर म्हणाले हाच आहे ‘इन्क्लुझिव्ह इंडिया’

मेहबूबा मुफ्तींसोबतची भाजपची युती ‘लव जिहाद’ होता का? शिवसेनेचा भाजपला सवाल

NCW chief Rekha Sharma explaination over Love Jihad remark and row Twitter