“लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं

| Updated on: Nov 26, 2020 | 8:47 AM

विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी लवकर लस येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे, असं साकडं घातलं.

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विठुराया चरणी साकडं
Follow us on

पंढरपूर: आता कोठे धावे मन | तुझे चरण देखिलिया || भाग गेला शीण गेला | अवघा झाला आनंदु || अशीच काहीशी भावना पंढरीच्या विठुराया चरणी नतमस्तक झाल्यावर होत असते. आज कार्तिक एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पवार दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. सत्कारावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, सारिका भरणे, अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांची उपस्थिती होती. (Deputy CM Ajit Pawar pays homage to Vitthal-Rukmini on Kartiki Ekadashi)

‘लवकर लस येऊ दे, अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’

पंढरीच्या विठुराया चरणी वंदन करताना अजित पवार यांनी कोरोनावर मात करण्यासाठी ‘लस लवकर येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे’, असं साकडं घातलं. ‘अवघ्या जगासमोर कोरोनाचं संकट आहे. आपण या संकटाला सामोरं जात आहोत. मधल्या काही काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत होतं. पण पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा काही बंधनं पाळणं, खबरदारी घेणं गरजेचं आहे’, असं आवाहन अजित पवार यांनी जनतेला केलं. तसंच आषाढी वारीप्रमाणे कार्तिकी वारीलाही सरकारनं केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल अजितदादांनी वारकरी संप्रदायाचे आभार मानले. यंदा राज्यातील जनतेच्या वतीनं आपल्याला विठ्ठलाची पूजा करण्याचं भाग्य लाभलं. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिकी वारी परंपरेनुसारच होईल, असा विश्वासही अजितदादांनी यावेळी व्यक्त केला.

‘शेतकऱ्यांचं दु:ख हलकं करण्याची ताकद दे’

कोरोना संकटापासून दूर करण्यासोबतच अजितदादांनी विठ्ठलाला अजून एक साकडं घातलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:ख हलकं करण्याची ताकद सरकारला दे, असं मागणंही अजित पवार यांनी घातलं. कोरोनाला आळा घालायचा असेल तर सर्वकाही पांडुरंगावर सोडून चालणार नाही. सरकारने घालून दिलेले सर्व नियम लोकांनी काटेकोरपणे पाळावे असं आवाहनही पवार यांनी केलं.

संविधान दिनाच्या शुभेच्छा

सीमेवर शत्रुशी लढताना वीरमरण आलेल्या जवानां अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. तसंच संविधान दिनानिमित्त राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छाही दिल्या. त्यानंतर अजित पवार यांच्याहस्ते मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयर यांना राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं दिला जाणारा प्रवास सवलत पास दिला. तसंच विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या दैनंदिनी – 2021 चं प्रकाशनही अजितदादांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील अधिकारी, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Photo : कानडा राजा पंढरीचा! कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात फुलांची आरास!

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चारही बाजूंनी पंढरपूरची नाकाबंदी!

मोठी बातमी! कार्तिकी एकादशीला आळंदीमधील मंदिर भक्तांसाठी खुलं, पण…

Deputy CM Ajit Pawar pays homage to Vitthal-Rukmini on Kartiki Ekadashi