कोकणावर आस्मानी संकट, महापूर, दरडी कोसळून हाहा:कार; भरपावसात प्रवीण दरेकरांनी पुसले अनेकांचे अश्रू

| Updated on: Jul 23, 2021 | 9:23 PM

कोकणावर आस्मानी संकट, महापूर, दरडी कोसळून हाहाःकार झालेला असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे भरपावसात मदतकार्याचा आढावा घेत आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आधार देत अश्रू पुसत आहेत.

कोकणावर आस्मानी संकट, महापूर, दरडी कोसळून हाहा:कार; भरपावसात प्रवीण दरेकरांनी पुसले अनेकांचे अश्रू
Follow us on

रायगड : कोकणावर आस्मानी संकट, महापूर, दरडी कोसळून हाहाःकार झालेला असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे भरपावसात मदतकार्याचा आढावा घेत आहेत. तसेच नुकसानग्रस्त भागातील नागरिकांना आधार देत अश्रू पुसत आहेत. हा आढावा घेताना त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केलीय. ना जिल्हाधिकारी, ना प्रांत, व साधा तलाठीसुद्धा या ठिकाणी वेळेत न पोहोचले. त्यामुळे ग्रामस्थांनाच पुढाकार घेत मदतकार्य करावे लागले, असंही त्यांनी नमूद केलं.

“रायगड, महाडमध्ये अस्मानी संकट कोसळले असताना तळये गावात दरड कोसळल्यामुळे 36 निष्पापांना आपले जीव गमवावे लागले. निगरगट्ट व बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणा सुमारे 20 ते 22 तासांनी दुर्घटनास्थळी पोहोचली. भावनाशून्य प्रशासन व बेजाबदार सरकारमुळे येथील पुरग्रस्तांना वेळीच मदत पोहोचली नाही,” असा आरोप दरेकर यांनी केलाय.

“घटनास्थळी ना जिल्हाधिकारी, ना प्रांत, ना साधा तलाठी”

प्रविण दरेकर म्हणाले, “पावसाची तमा न बाळगता विरोधी पक्षातील नेते या ठिकणी वेळेत पोहोचू शकतात, तर सत्ताधारी मंत्री, आमदार व प्रशासकीय यंत्रणेतील बेजबाबदार बाबू कुठे गायब झाले होते? तळये गावात दरड कोसळण्याची घटना गुरुवारी (22 जुलै) सायंकाळी 4 वाजता घडून देखील आतापर्यंत सरकारची काहीही मदत किंवा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही. इथे तलाठीही नाही, जिल्हाधिकारी नाही. विरोधी पक्षनेते व भाजपाचे आमदार, कार्यकर्ते धडपडत गावात पोहोचतात, परंतु सरकारच्या हलगर्जीपणा आणि बेपर्वाईमुळे तळये येथील बळी गेले आहेत.”

मुसळधार पावसात महाड, तळये येथील बचावकार्यात सहभाग

सरकारी यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर काही जीव वाचवता आले असते, अशी खंत तळये गावातून प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली. 22 जुलै रोजी रात्री दरेकर माणगाव येथील पूरग्रस्तांच्या बचावकार्यात सहभागी झाले तर आज (23 जुलै) सकाळी माणगाव, महाड येथील पूरस्थितीची पाहणी करीत येथील नागरिकांना मदतीचा हात दिला. महामार्गावर वाहनांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.

काहींची त्यांनी निवासाची व्यवस्था केली. त्यानंतर पुढे पावसातच खडतर मार्गक्रमण करीत तळये गावातील दुर्घटनास्थळी पोहोचून दरेकर नागरिकांच्या मदतकार्यात सामील झाले. त्यानंतर पूरामुळे नुकसान झालेल्या महाड येथील एसटी डेपोची तसेच तेथील बाजारपेठेची पाहणी केली व त्यांना मदत पोहचविण्याच्या दृष्टीने दरेकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या.

“तळयेमधील निष्पाप बळी हे बेपर्वा सरकार व भावनाशून्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी”

“तळये गावात स्थानिक ग्रामस्थ व तरुणांकडून बचावकार्य सुरू असताना राज्य सरकारला मात्र या दुर्घटनेचे काहीही सोयरसुतक दिसले नाही. कोकणातील घरे डोंगरावर वसलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणांनी पूर्वीच काळजी घेतली गेली पाहिजे होती. आधीच लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असते तर काही जीव आपल्याला नक्कीच वाचवता आले असते,” असेही प्रविण दरेकर यांनी सांगितले.

पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना दरेकर यांनी जीवनावश्यक वस्तू

रायगड, महाड येथील मुसळधार जलप्रलयात अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी मुसळधार पावसाची तमा न बाळगता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे मुंबईतून संततधार पावसात अतिशय खडतर प्रवास केला. ते गुरुवारी (22 जुलै रोजी) प्रविण दरेकर माणगावजवळील तासगाव टोल नाक्यापर्यंत कसेबसे पोहोचले. परंतु रस्त्यावर जवळजवळ 6 ते 8 फूट पाणी असल्यामुळे व मार्ग बंद असल्यामुळे रेस्क्यू टीमने पुढे जाण्यास अटकाव केला. परंतु सकाळ होताच प्रविण दरेकर यांनी रेस्क्यू टीम व एनडीआरएफसोबत चर्चा करून येथील पूरपरिस्थितीची व बचाव कार्याची माहिती घेतली. पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना दरेकर यांनी जीवनावश्यक वस्तू देत संकटात अडकलेल्या जनतेला धीर दिला.

महाडकरांच्या बचावाकरता सरकारी यंत्रणेने बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीमही उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुले मदतीला आली. ग्रामस्थांच्या मदतीने तळये येथे दरडीखाली दबले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले, पण परंतु प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मदतीला वेळेत पोहोचू शकले नाहीत ही शरम आणणारी गोष्ट असल्याचे दरेकर यांनी सांगितले. त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाले होते.

हेही वाचा :

महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार, वेगवेगळ्या घटनांमध्ये 89 जणांनी जीव गमावला, कुठे किती मृत्यू?

Big Breaking | महाडमध्ये दरड कोसळली, 30 घरे मातीखाली दबल्याने 72 नागरिक बेपत्ता असल्याचा अंदाज

मृत्यू काही क्षणांच्या अंतरावर, ‘या’ निर्णयानं जीव बचावला, माळशेज घाटातील अंगावर काटा आणणारी घटना

व्हिडीओ पाहा :

Pravin Darekar criticize state government over rescue and help work in Raigad Mahad