तुझ्या माहेरचे 24 जण अपघातात गेले, मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताच बापाचा बांध फुटला

| Updated on: Feb 27, 2020 | 3:57 PM

राजस्थानातील बुंदीमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. बस थेट नदीत कोसळून 27 वऱ्हाडींपैकी 24 जणांचा मृत्यू झाला

तुझ्या माहेरचे 24 जण अपघातात गेले, मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताच बापाचा बांध फुटला
Follow us on

जयपूर : नियती काय अजब खेळ खेळेल, याची कोणाला कल्पना नसते, असं म्हणतात. राजस्थानातील बुंदीमध्ये वऱ्हाडाच्या बसला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 24 जणांचा मृत्यू झाला. नातीच्या लग्नाला निघालेल्या आजी-आजोबा, मामा-मामी आणि भावंडांसह 24 नातेवाईक एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेले. मुलीचं लग्न निर्विघ्न पार पडेपर्यंत पित्याने ही दुःखद वार्ता हसऱ्या चेहऱ्याने गिळून ठेवली होती, मात्र तिच्या डोक्यावर अक्षता पडताच ‘काही वेळापूर्वीच तुझ्या माहेरचे 24 जण अपघातात गेले’ असं कणखर पित्याने धाय मोकलून रडत सांगितलं. (Accident kills relatives coming to wedding)

वेळ सकाळी नऊ वाजताची. रमेश चंद्र यांचं कुटुंब मोठ्या धुमधामीत लग्नाची तयारी करत होतं. अकरा वाजता लग्नाच्या विधींना सुरुवात होणार होती. इतक्यात दबक्या पावलांनी काळाने घाला घातला. लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या बसला बुंदीजवळ मेज नदीवर भीषण अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पुलावरुन जाणारी बस थेट नदीत कोसळली. नटूनथटून लग्नाच्या हॉलकडे निघालेल्या 27 वऱ्हाडींपैकी 24 जणांचा काळाने घास घेतला. बसमध्ये असलेलं आनंदाचं वातावरण क्षणातच चित्कारांमध्ये पालटलं.

वऱ्हाडाला झालेल्या अपघाताची बातमी रमेश चंद्र यांच्यापर्यंत पोहचली आणि त्यांचं अवसानच गळालं. रमेश यांचं डोकं बधीर झालं. पुढे काय करावं, हेच त्यांना सुचेना. पण पुढच्याच क्षणी त्यांनी धीर एकवटला. आपल्या पत्नीला आणि बोहल्यावर उभ्या असलेल्या मुलीला ही दुःखद वार्ता समजली, तर काय होईल, याची कल्पनाही त्यांनी करवेना. उसनं अवसान आणून रमेश चंद्र उभे राहिले. ही बातमी वधू आणि वधूमायपर्यंत पोहचू द्यायची नाही, असं त्यांनी नातेवाईकांना बजावलं. डोक्यात सतत तेच विचार असतानाही, ते हसऱ्या चेहऱ्याने पत्नीला सामोरे गेले.

रमेशचंद्र यांच्या मनातील द्वंद्व सुरु झालं. एकीकडे आनंद दाखवत लग्नाचे विधी करताना 24 अंत्यविधींचं दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होतं. दुपार होत आली, तरी माहेरची माणसं न आल्यामुळे रमेश चंद्र यांची पत्नी सारखी घड्याळाकडे पाहत होती. आई-बाबा, दादा-वहिनी अजून का आले नाहीत, असं सारखं विचारत होती. तेव्हा, आईची तब्येत वाटेत बिघडल्यामुळे सर्व जण खोळंबले आहेत, असं खोटं कारण तिला सांगण्यात आलं. मायलेकींच्या हाती मोबाईल पडणार नाही, याची काळजीही सर्व नातेवाईकांनी मिळून घेतली.

सप्तपदी होईपर्यंत रमेशचंद्र हळूच अश्रूंना वाट मोकळी करुन देत होते. दुर्दैव म्हणजे रमेश चंद्र यांच्या 20 वर्षीय मुलाचा काही महिन्यांपूर्वीच अचानक मृत्यू झाला होता. अशातच कन्येच्या विवाहमार्गात उभ्या राहिलेल्या संकटाला रमेशचंद्र यांनी धीराने तोंड दिलं. मनातील घालमेल कशीबशी लपवत लग्न समारंभ त्यांनी पार पाडला.

मुलीच्या पाठवणीची वेळ जवळ आली, तसा रमेश यांच्या अश्रूंचा बांध फुटला. सकाळी झालेल्या अपघातात तुझ्या माहेरच्या 24 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याचं त्यांनी पत्नी आणि मुलीला सांगितलं. या आघातामुळे वधू आणि वधूमाय हादरल्या. नव्या आयुष्याची सुरुवात करणाऱ्या नववधूवर दुःखाचा डोंगर कोसळला. लग्नमंडपात शोककळा पसरली. परंतु वडिलांनी दाखवलेला धीरोदात्तपणा सर्वांच्या चर्चेचा विषय होता. (Accident kills relatives coming to wedding)

आजची सर्वाधिक वाचलेली बातमीनाशकात सुट्टीवर घरी आलेल्या जवानाकडून पत्नीची हत्या