Ashok Chavan | अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले.. नेत्यांची ती भूमिका दुर्दैवी..

अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते लवकरच ते अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून अनेक प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनीही एक ट्विट केलं आहे.

Ashok Chavan | अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर रोहित पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले..  नेत्यांची ती भूमिका दुर्दैवी..
| Updated on: Feb 12, 2024 | 2:59 PM

मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. मात्र त्यापूर्वीच काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेस पक्षात अनेक दशकांपासून असलेले अनेक ज्येष्ठ नेते आता एकामागोमाग पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे. मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांच्यापाठोपाठ काँग्रेसमधील आणखी एक वरिष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. लवकरच ते अमित शहांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून अनेक प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

राष्ट्रवादीचे तरूण नेते रोहित पवार यांनीही देखील यासर्व राजकीय घडामोडींवर भाष्य करणारं एक ट्विट केलं आहे. ‘ संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे ‘ असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. विविध पक्षातील वरिष्ठ नेते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षं अथक मेहनत करून उभा केलेला पक्ष निखळतो, फुटतो हे दुर्दैवी असल्याचं त्यांच्या ट्विटमधून स्पष्ट होत आहे.

काय म्हणाले रोहित पवार ?

विचारधारेसाठी लढण्याची आज खऱ्या अर्थाने गरज असताना संपूर्ण आयुष्यभर ज्या विचारधारेसाठी लढलो त्याच विचारधारेचा त्याग करून भाजपशी सलगी करण्याची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी आहे. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल आणि जनताही त्यासाठी सज्ज आहे!