जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

मुंबई : गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली. ट्विट करुन शरद पवारांनी संताप व्यक्त केला. शरद पवार काय म्हणाले? महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली […]

जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले
Follow us on

मुंबई : गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्र्यांना जनाची नाही तरी मनाची लाज वाटत असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शरद पवार यांनी केली. ट्विट करुन शरद पवारांनी संताप व्यक्त केला.

शरद पवार काय म्हणाले?

महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया ही नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात 16 एस.आर.पी.एफ. जवान मृत्यूमुखी पडले. गृहखात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा. ज्यांना ‘ जनाची नाही तरी मनाची’  लाज असते अशांकडून राजीनाम्याचा निर्णय घेतला गेला असता. पण ते आजच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडून होणे नाही. सबब नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध आणि मृत्यूमुखी पडलेल्या जवानांबद्दल दु:ख व्यक्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं शरद पवार म्हणाले.

भ्याड नक्षली हल्ला

गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवानांसह एक ड्रायव्हर शहीद झाले आहेत. पोलिसांच्या शीघ्र कृती दलावर नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यात 16 जवान शहीद झाले. सी 60 तुकडीचे हे सर्व जवान होते. गस्तीवर जाणाऱ्या जवानांना लक्ष्य करुन नक्षल्यांनी हा हल्ला केला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. आज महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर आज पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. काल नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला.

नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या 

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक   

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?  

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?  

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?  

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!