चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार

| Updated on: Oct 17, 2019 | 12:22 PM

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून वगळण्यात आल्याने टीकेची झोड उठली आहे

चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार
Follow us on

मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासच हद्दपार (Shivaji Maharaj History Textbook) करण्यात आला आहे. निवडणुकांच्या तोंडावर शिवरायांच्या नावे मतांचा जोगवा मागितला जात असतानाच हा प्रकार घडत असल्यामुळे संतापाची लाट पसरली आहे.

राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं, या हेतूने शिक्षण विभागाने ‘आंतरराष्ट्रीय’ असं नामकरण केलं. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तकं ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. त्यातून हा प्रकार समोर आला आहे.

बालवयातच विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, शौर्याची गाथा समजावी, यासाठी इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आला. मात्र आता हा जाज्वल्य इतिहासच शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे.

इयत्ता चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास (Shivaji Maharaj History Textbook) शिकवण्यात येतो. सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना 1991 मध्ये चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात काही बदल करण्यात आले होते. त्यावेळी विरोध झाल्यानंतर चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही न बदलण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर झाला होता.

शिवाजी महाराजांचा पराक्रम, लढाया यांचा समावेश इतिहासाच्या पुस्तकात केलेला दिसत नाही. केवळ ‘भारतीय लोक’ या पाठामध्ये शिवाजी महाराज, रामदास स्वामी, एकलव्य, लाल बहादूर शास्त्री आणि हनुमान यांची छोटेखानी माहिती आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय, शिवस्मारकाच्या उभारणीत केलेला अक्षम्य विलंब हे कमी होतं म्हणून की काय भाजपा-शिवसेना सरकारने आता चौथीच्या पुस्तकातून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘इतिहास’ हद्दपार करण्याचा घाट घातलाय. हे अतिशय दुर्देवी असल्याचं सांगत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी याचा तीव्र निषेध केला आहे.

छत्रपती शिवरायांचा या सरकारने केवळ स्वार्थासाठी वापर केल्याचे आता उघड होत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असलेले खासदार संभाजी महाराज यांनीही संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.