दोस्त असावा तर असा! भारत-रशिया मैत्रीची रंजक कहाणी

| Updated on: Jun 23, 2020 | 11:03 PM

भारतानं रशियाला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. तर रशियानंही भारतानं दिलेल्या प्रत्येक हाकेला साद दिली (India Russia friendship).

दोस्त असावा तर असा! भारत-रशिया मैत्रीची रंजक कहाणी
Follow us on

मुंबई : भारत आणि रशिया दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ मैत्री आहे (India Russia friendship). गेल्या 70 वर्षात भारत-रशियात वाद झाल्याची एकही घटना नाही. भारत आणि रशिया संबंधात कटुता निर्माण झाल्याची एकही बातमी कधी छापून आलेली नाही. भारतानं रशियाला दिलेला प्रत्येक शब्द पाळला. तर रशियानंही भारतानं दिलेल्या प्रत्येक हाकेला साद दिली (India Russia friendship).

बांग्लादेशच्या स्वातंत्र्यांवरुन 1971 साली भारत-पाकिस्तानात युद्ध झालं. मात्र तेव्हा अमेरिका, चीन, ब्रिटन, फ्रान्स हे सर्व देश भारताच्याविरोधात आणि पाकिस्तानच्या समर्थनात उभे होते. 1971 च्या युद्धात तर भारताविरोधात अमेरिकेची युद्धनौका चाल करुन येत होती. मात्र तेव्हा रशियानं भारताच्या बाजूनं पाणबुडी उतरवली. त्यामुळे अमेरिकेला माघारी फिरावं लागलं.

हेही वाचा : Made In China | चिनी वस्तू इतक्या स्वस्त कशा? कॉपीकॅट चीनच्या बनवेगिरीची कहाणी

काही युरोपियन देशांनी 1962 साली संयुक्त राष्ट्रात काश्मीरवरुन प्रस्ताव आणला होता. त्या प्रस्तावाच्या आडून भारतापासून काश्मीर तोडण्याचा डाव होता. या डावाला अमेरिका, ब्रिटन आणि चीनचीही फूस होती. मात्र अनेक युरोपियन देशांना झुगारुन तेव्हासुद्धा रशियाच भारतासाठी उभा राहिला. आपल्या शंभराव्या व्हिटोचा वापर करुन रशियानं हा प्रस्ताव धुडकावून लावला.

रशियन डिफेन्स इंडस्ट्रीचा भारत सर्वात मोठा खरेदीदार देश आहे. भारत एकूण शस्रांपैकी 70 टक्के शस्रं फक्त रशियाकडूनच खरेदी करतो. विशेष म्हणजे रशिया फक्त शस्रचं देत नाही, तर त्या शस्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा देतो. जगात अमेरिका आणि इस्रायल हे दोन्ही देशसुद्धा मोठे शस्रं उत्पादक देश आहेत. मात्र ते टेक्नॉलॉजी कधीच देत नाहीत. पण रशियाने भारताला शस्रांबरोबरच त्याची टेक्नॉलॉजीसुद्धा दिली.

हेही वाचा : ‘कोरोना’ म्हणजे ‘कुंग फ्लू’, निवडणूक प्रचाराच्या पहिल्याच रॅलीत ट्रम्प यांचे चीनवर शरसंधान

रशियासोबत शस्र खरेदीचा करार करु नका, म्हणून अमेरिकेनं अनेक देशांना धमक्या दिल्या होत्या. अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारतानं रशियासोबत S-400 अँटी बॅलेस्टिकचा मिसाईल खरेदीचा करार केला. भारतानं अमेरिकेला न भीता भारत-रशिया संबंधात कधीच कटुता येऊ दिली नाही.

अंतराळ मोहिमांमध्ये तर भारत-रशियाचे संबंध अत्यंत जुने आहेत. भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा रशियातूनच लाँच झाला. कारण, त्या काळात भारताकडे लाँचिंग पॅड नव्हते. राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय होते. ती गोष्ट सुद्धा रशियाच्या मदतीनंच शक्य झाली. सध्या भारत ज्या गगनयान मोहिमेसाठी प्रयत्न करतोय. त्यासाठी भारतीय अंतराळवीरांना रशियाकडून प्रशिक्षण दिलं जातं आहे.

आशिया खंडात भारत एकटा पडावा, यासाठी चीन आणि पाकिस्ताननं अनेकदा प्रयत्न करुन पाहिले. रशियाला भारतापासून दूर करण्याचे डावसुद्धा रचले गेले. मात्र भारत-रशिया संबंधांवर त्यात काडीचाही फरक पडला नाही. अलीकडे भारताचे अमेरिकेसोबतचे संबंध वाढले आहेत. मात्र अमेरिकेच्या नादी लागून भारतानं कधीच रशियाला दूर केलं नाही. रशियानंसुद्धा आशिया खंडात भारताला कधीच एकटं पडू दिलेलं नाही.