नोकरी गेली,लग्न मोडलं,बदनामी… मुंबई पोलिसांची एक चूक अन् सैफचा हल्लेखोर म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त
सैफ अली खानवरील हल्ल्यात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या हल्लेखोराचं आयुष्यच उधवस्त झाल्याचं त्यानं सांगितलं आहे. लग्न मोडलं, नोकरी गेली, कुटुंबाची बदनामी झाली.एक ना अनेक संकटांनी आयुष्य घेरल्याचं संशयीत हल्लेखोराने सांगितलं. या सर्वांबद्दल त्या व्यक्तीने सैफ अली खान आणि मुंबई पोलिसांना जबाबदार धरलं आहे.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचा चालक आकाश कनोजिया (३१) याला अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यातील संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथून ताब्यात घेण्यात आले होते, परंतु नंतर त्याला सोडून देण्यात आले. सुटका झाल्यानंतर आकाश कनोजियाची व्यथा चव्हाट्यावर आली आहे.
संशयित म्हणून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं
सैफ अली खानवर हल्ला झाला त्यानंतर तपासाची सर्व चक्रे फिरली आणि मुंबई पोलिसांनी त्या हल्लेखोराचा कसून तपास सुरु केला. सीसीटीव्हीमध्ये जेव्हा त्या हल्लेखोराचा चेहरा दिसला तेव्हा पोलिसांनी तपासाचा वेग आणखी वाढवला. काही वेळात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं. पण हा व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या हल्लेखोराशी मिळता-जुळता वाटल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं.
या संशयित व्यक्तीचं नाव आहे आकाश कनोजिया. आकाश मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसचा चालक आहे. त्याला 16 जानेवारीला सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यातील संशयित म्हणून दुर्ग, छत्तीसगड येथून ताब्यात घेण्यात आलं. 18 जानेवारी रोजी रेल्वे सुरक्षा दलाने त्याला ताब्यात घेतले होतं.
पण नंतर 19 जानेवारी रोजी सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक केली, त्यानंतर दुर्ग आरपीएफने कनोजियाला सोडण्यात आलं.
पोलिसांची एक चूक अन् संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे आयुष्य उद्धवस्त
पण पोलिसांच्या या तपासातील एका गोष्टीमुळे कोठडीतून सुटल्यानंतर कनोजियाचे आयुष्य मात्र उद्धवस्थ झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं त्याने सांगितले. आकाशने त्याची व्यथा मांडत सांगतिलं या घटनेमुळे तो बेरोजगार झाला आहे, त्याचं ठरलेलं लग्न मोडलं आणि कुटुंबाची बदनामी झाली ती वेगळी.
Mumbai Police clarified that the man named Akash Kanojia, who was detained from Chhattisgarh yesterday, was just a suspect, not an accused, and they will be releasing him soon. pic.twitter.com/4KPP5ywpKJ
— Mr Sinha (@MrSinha_) January 19, 2025
संशयितास ताब्यात घेतल्यानंतर काय घडलं?
कनोजिया यांनी सांगितले की, “जेव्हा मीडियाने त्याचे फोटो दाखवण्यास सुरुवात केली आणि दावा केला की मी या प्रकरणात मुख्य संशयित आहे, तेव्हा माझ्या कुटुंबाला धक्का बसला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. मुंबई पोलिसांच्या एका चुकीने माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. माझ्या मिशा आहेत हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि अभिनेत्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी व्यक्ती मी नाही हेही त्यांच्या लक्षात का आले नाही?” असा सवाल आकाशने उपस्थित केला आहे.
मुंबई पोलिसांच्या पथकाने मारहाण केली
त्याने पुढे सांगितले की, “या घटनेनंतर मला पोलिसांचा फोन आला आणि त्यांनी मला विचारले की मी कुठे आहे. मी घरी असल्याचं सांगितल्यावर कॉल कट झाला. मी माझ्या भावी वधूला भेटण्यासाठी जात होतो, तेव्हा मला दुर्गमधून ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर रायपूरला नेण्यात आलं. तेथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली.” असं म्हणत आकाशसोबत झालेली ती दुर्दैवी घटना त्याने सांगितली.
नोकरी गेली, लग्न मोडलं अन्…
कनोजियाने या घटनेनंतर त्यांच्या नोकरी पासून ते खासगी आयुष्यात काय उलथापालथ झाली त्याबद्दल सांगितले. तो म्हणाला,” मला ताब्यात घेतल्यानंतर नोकरीवरून काढून टाकले. मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्यांनी मला कामावर न येण्यास सांगितले. त्यांनी माझं ऐकून घेण्यासही नकार दिला. तेव्हा माझ्या आजीने मला सांगितले की माझ्या होणाऱ्या पत्नीच्या घरच्यांनीही लग्नही मोडलं आहे. त्याच्यावर कफ परेडमध्ये दोन आणि गुडगावमध्ये एक गुन्हा दाखल आहेत, पण याचा अर्थ असा नाही की मला अशा प्रकारे संशयित म्हणून पकडलं जावं.” एवढच नाही तर तो पुढे म्हणाला, “मी सैफ अली खानच्या इमारतीबाहेर उभा राहून नोकरी शोधण्याचा विचार करत आहे कारण त्याच्यासोबत जे काही घडलं त्यामुळे मी सर्वस्व गमावलं आहे” असं म्हणतं आकाशने त्याच्या आयुष्यातील आलेल्या संकटांचा पाढाच वाचून दाखवला.
