‘पुण्यात जून अखेरपर्यंत पाणीकपात नाही’
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावला असला, तरी जून अखेरपर्यंत पुण्यासाठी पाणी कपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले. धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. पाण्यात कपात होणार नसली […]
पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा खालावला असला, तरी जून अखेरपर्यंत पुण्यासाठी पाणी कपात करण्यात येणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केले. धरणातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री गिरिश बापट यांनी आज तातडीची बैठक बोलाविली होती. या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. महापालिका आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
पाण्यात कपात होणार नसली तरी दर 10 दिवसांनी पाणी पुरवठ्यासंदर्भात आढावा घेण्यात येणार असल्याचेही बापट यांनी नमूद केले. या बैठकीस पाटबंधारे विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत 20 टक्के पाणीसाठा शिल्लक असून हे पाणी 15 जुलैपर्यंत पुरेल, याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी महापालिका आणि पाटबंधारे विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली. शिल्लक पाणीसाठा पुरेसा असून कपातीची गरज नसल्याचे गिरीश बापट यांनी सांगितले. तसेच पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक पाऊले उचलण्यासाठी वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांशीही बोलू, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मागील 5 वर्षे पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणाऱ्या गिरीश बापट यांना निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्नावरुन पुणेकरांच्या रोषालाही सामोरे जावे लागले होते. ‘आम्ही पाण्यासाठी गेले कित्येक दिवस झगडतो आहोत, मात्र आमच्या परिसरात पाणीच मिळत नाही. आता आम्ही मतदान का करावे?, असा थेट प्रश्न त्यावेळी नागरिकांनी विचारला होता.