Uddhav Thackeray Solapur Visit | सत्तर वर्षांत इतका पाऊस पाहिला नाही, वृद्ध शेतकरी रडवेला, उद्धव ठाकरेंकडून धीर

| Updated on: Oct 19, 2020 | 12:29 PM

नेमकी किती मदत करायची याची माहिती मी गोळा करत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल, नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

Uddhav Thackeray Solapur Visit | सत्तर वर्षांत इतका पाऊस पाहिला नाही, वृद्ध शेतकरी रडवेला, उद्धव ठाकरेंकडून धीर
Follow us on

सोलापूर : माझ्या 70 वर्षांच्या आयुष्यात एवढा पाऊस पाहिला नव्हता, अशा शब्दात शिवशंकर कोंणगे या शेतकऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा मांडली. तुमच्या आशीर्वादांच्या जोरावरच या संकटातून बाहेर पडू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणगेंना धीर दिला. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री दौऱ्यावर निघाले आहेत. सोलापुरातील रामपूर गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. (Uddhav Thackeray gives relief to 70 years old farmer in Solapur Visit)

“आमच्या सरकारची सुरुवात झाल्यापासून न भूतो न भविष्यती संकटं येत आहेत. कोरोनाचं संकट आलं आता अतिवृष्टीचं संकट आहे. संकटाचे डोंगर उभे राहत आहेत. शेतकऱ्यांचे आमच्यावर आशीर्वाद आहेत. या आशीर्वादांच्या जोरावरच आम्ही या संकटातून बाहेर पडू” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी 11 जणांना प्रत्येकी 95 हजाराचे चेक देऊन दिलासा देण्यात आला.

दरम्यान, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. सध्या, नेमकी किती मदत करायची याची माहिती मी गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

उद्धव ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांना आश्वस्त केले. माहिती उपलब्ध झाल्यावर आम्ही त्यावर अभ्यास करत बसणार नाही. तात्काळ मदत जाहीर करू. येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गरज पडल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही मदत मागू, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मला यावरुन कोणतेही राजकारण करायचे नाही. मात्र, केंद्र सरकारने राज्याची देणी थकवली आहेत. ते पैसे मिळाले असते तर केंद्र सरकारकडे हात पसरावे लागले नसते. राज्यातील विरोधी पक्षांनी यावरुन राजकारण करु नये. कधीकाळी आपणही सत्तेत होतो, याचे भान विरोधी पक्षाने ठेवावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

याशिवाय, राज्यात अतिवृष्टीचे संकट कायम असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांना मदतीचे चेक वाटप

हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

केंद्रानं राज्याचं देणं द्यावं, मदतीसाठी हात पसरावे लागणार नाही; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना झापलं

(Uddhav Thackeray gives relief to 70 years old farmer in Solapur Visit)