मुख्यमंत्र्यांवर जेवढा अधिकार आमचा तेवढाच अशोक चव्हाणांचा, उद्धवजी, विकासाचा कोणताच प्रस्ताव नाकारणार नाही : विनायक राऊत

| Updated on: Oct 31, 2020 | 1:57 PM

मुख्यमंत्र्यांवर जेवढा आमचा अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाण यांचा देखील आहे. त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री कधीच नामंजूर करणार नाहीत, असं शिवसेना नेके खासदार विनायक राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांवर जेवढा अधिकार आमचा तेवढाच अशोक चव्हाणांचा, उद्धवजी, विकासाचा कोणताच प्रस्ताव नाकारणार नाही : विनायक राऊत
Follow us on

रत्नागिरी : काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, असा आरोप करुन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली. मात्र यानंतर शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी महाविकास आघाडीची बाजू लावून धरत आमचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अशोक चव्हाणांचा देखील आहे. त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री कधीच नामंजूर करणार नाहीत, असं ते म्हणाले. (Vinayak Raut On Ashok Chavan Alligation Cm Uddhav Thackeray)

काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी एकप्रकारे आपली खदखद मांडली. चव्हाणांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता असताना खा. विनायक राऊत यांनी समजदारपणाची भूमिका घेतली. ‘अशोक चव्हाण ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडून कधीच नामंजूर होणार नाही’, असं म्हणत राऊतांनी महाविकास आघाडीची बाजू उचलून धरली तसंच मुख्यमंत्र्यांचीही पाठराखण केली.

“शिवसैनिकांचा जेवढा मुख्यमंत्र्यांवर अधिकार आहे तेवढाच अधिकार तिन्ही पक्षातील नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांवर आहे. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष सामील आहेत. सरकार लवकरच यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण करेल. मुख्यमंत्री विकासाचा कोणताच प्रस्ताव कधीच नाकारणार नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.

“महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं काही आलबेल आहे. तिन्ही पक्षातील नेत्यांचे एकमेकांसोबत चांगले संबंध आहेत. तसंच वेळोवेळी चर्चाही होत असते. त्यामुळे विसंवाद आहे असं म्हणता येणार नाही”, असंही विनायक राऊत यांनी सांगितलं.

राज्यपाल नियुक्त आमदारांवरदेखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, ते म्हणाले, “राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे शिफारस करण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो. परंतु ती शिफारस मान्य करण्याची जबाबदारी राज्यपालांची आहे. मात्र त्यासाठी विशिष्ट कालावधी नाही. त्यामुळे राज्यपाल त्यांच्या सदविवेकबुद्धीने अभ्यास करतील. मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेली नावे राज्यपाल ताटकळत ठेवतील असं वाटत नाही”.

लॉकडाऊनच्या कालावधीतील राज ठाकरे यांच्या शिफारसी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या तसंच त्या मोठ्या मनाने स्वीकारल्या, असं सांगत राज ठाकरे-राज्यपाल कोश्यारी भेटीवर राऊतांनी अधिक बोलणं टाळलं.

(Vinayak Raut On Ashok Chavan Alligation Cm Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या

काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप; आघाडीत खळबळ