Pandharpur Rain | चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळली, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश

| Updated on: Oct 14, 2020 | 5:55 PM

चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे. (Wall Collapsed at Pandharpur)

Pandharpur Rain | चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळली, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश
Follow us on

पंढरपूर: पंढरपूर : शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली. (Wall Collapsed at Chandrabhaga river and Six died in Pandharpur )

दुर्घटनेचे माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटालगत घाटाचे काम सुरू होते. गेल्या काही दिवसातील पावसामुळे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तेथील भिंत कोसळली.

घाटाच्या भिंतीच्या आडोशाला आठ जण बसले होते. भिंत कोसळल्यानंतर सर्व जण ढिगाऱ्याखाली दबले. यामध्ये चार महिला व चार पुरुषांचा समावेश होता. सहा जणांचा जागीच मृत्यु झाला तर दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले. परंतु, जोरदार पावसामुळे मदतकार्यात अडचण येत आहे.

मुसळधार पावसामुळे शहरातील संत पेठ परिसरासह सखल भागात सर्वत्र पाणी साचले आहे. अनेक घरांमध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंबं अडचणीत आली आहेत. पंढरपूर शहरातील तालुका पोलीस ठाणे, सरगम चित्रपटगृह या दोन्ही रेल्वे पुलांखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शहराच्या अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील  अक्कलकोटमधील राजवाड्याचा बुरूज ढासळला. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता.

शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्याला झोडपले आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झाले असून टाकळी, कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.

संबंधित बातम्या:

 Maharashtra Rain | पंढरपूर तालुक्यातील डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचं नुकसान, शेतकरी संकटात

TV9नं केलेल्या स्टिंग ऑपरेशनचा इम्पॅक्ट, पंढरपूरमध्ये मेडिकल स्टोअरवर कारवाई

(Wall Collapsed at Chandrabhaga river and Six died in Pandharpur )