
योगगुरू रामदेव बाबा आपल्या पतंजली कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती करतात. या उत्पादनांच्या माध्यमातून ते आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करतात. आज पतंजलीची उत्पादने प्रत्येक घरात आहेत. दरम्यान, ते फक्त पतंजलीच्या माध्यमातूनच लोकांच्या आरोग्यासाठी काम करतात असे नाही. ते यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनदेखील चांगले आरोग्य राखण्यासाठी वेळोवेळी माहिती देत असतात. सध्या त्यांनी यूट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी केस गळत असतील तर नेमके काय करावे? याबाबत सविस्तर माहिती दिली आहेत. सोबतच केसगळतीचे कारणही त्यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.
रामदेव बाबा यांच्या मतानुसार केस गळण्यामागचे अनेक कारणं आहे. पण ही केसगळती थांबवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येऊ शकतात. शरीरात लोहाची कमतरता, शरीरात गरमी असते तसेच इतर पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळायला लागतात, असे रामदाव बाबा यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. हीच केसगळती होऊ नये यासाठी त्यांनी पुढे काही उपायदेखील सांगितले आहेत.
केसगळती थांबवायची असेल तर तुमच्या आहारात एका ज्यूसचा समावेश करावा, असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे. त्यांनी भोपळ्याचे ज्यूस पिण्याचा सल्ला दिला आहे. हे ज्यूस तयार करताना त्यात धने, पुदिना, लिंबू (जळजळ होण्याचा त्रास असेल तर लिंबू टाकू नका) टाकावे. या ज्यूसमुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच तुमच्या पचनसंस्थेत सुधारणा होईल, असे रामदेव बाबा यांनी सांगितले आहे.
आवळ्यात सी जीवनसत्त्व असते. त्यामुळे आवळा हा त्वचा तसेच केसांसाठी फार लाभदायी ठरतो. ज्यूस पावडर, मुरब्बा अशा कोणत्याही पद्धतीने आवळा काऊ शकता. यामुळे तुमची केसगळती थांबेल, असे रामदेव बाबा यांचे मत आहे. सोबतच रामदेव बाबा यांनी प्राणायाम करण्याचाही सल्ला दिला आहे. प्राणायाममुळे केसगळती कमी होते. विशेषत: अनुलोम-विलोम हा प्राणायम केसगळती थांबवण्यास फार उपयोगी पडतो, असे मत रामदेव बाबा यांचे आहे.
रामदेव बाबा यांनी रसायनयुक्त सौंदर्य प्रसाधनं वापरण्याऐवजी नैसर्गिक वस्तूंचा वापर करावा, असा सल्ला दिला आहे.
(टीप- कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या)