
संपुर्ण जगभरात आपल्या भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे कौतुक केले जाते. आपल्या देशातील विविधता आणि साधेपणा तसेच पेहरावाची शैली व खाद्यपदार्थ हे देखील इतर देशातील लोकांना खूप आवडते. आपल्याकडे वडीलधाऱ्यांचा आदर करणे आणि चांगल्या आरोग्यासाठी योगा करणे हे देखील जगभरात प्रसिद्ध आहे. या सवयी केवळ भावनिकदृष्ट्या जोडल्या गेलेल्या नाहीत तर आपल्या योग्य जीवनशैली आणि शिस्तीसाठी देखील महत्त्वाच्या मानल्या जातात. यासाठी भारतातील विविधता तसेच संस्कृती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येत असतात. आज संपूर्ण जग या सवयींचा अवलंब करते. पण याव्यतिरिक्त अशा अनेक चांगल्या सवयी देखील आहेत, जे केवळ आपल्यातच राहिलेले नाही तर जपानमध्येही या सवयींचा अवलंब केला जातोय.
भारत आणि जपान या दोन्ही देशांच्या परंपरा आणि शिस्त खूप जवळून जोडल्या गेल्या आहेत. तर आपल्या भारतीयांच्या काही सवयी आहेत ज्या जपानमधील लोकं देखील त्यांच्या आयुष्यात स्वीकारत आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या दोन्ही देशांमध्ये खूप सामान्य आहेत.
जमिनीवर बसून जेवण करणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते. तर जपानमध्येही लोकं जमिनीवर बसून जेवतात. तिथे एक लहान टेबल असते ज्यावर जेवण ठेवले जाते आणि तेथील लोकं चटईवर बसून जेवण जेवतात. तर जपानची ही खाण्याची सवय भारतीय शैलीशी जुळते.
आपल्या भारतात वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून त्यांच्या पायांना स्पर्श करण्याची आणि त्यांच्याशी आदराने बोलण्याची परंपरा आहे. जपानी संस्कृतीतही हेच दिसून येते. तिथे, डोके टेकवून कृतज्ञता व्यक्त केली जाते. यातून नम्रता आणि इतरांबद्दल आदर दिसून येतो. दोन्ही देशांमध्ये आदर हा सर्वात महत्वाचा गुण मानला जातो.
योग आणि ध्यान हे जीवनशैलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जपानमध्ये ध्यानाला जाझेन म्हणतात. ही एका जागी बसून ध्यान करण्याची पद्धत आहे. जपानमधील लोकं नियमितपणे ध्यान आणि योगा करत असतात. मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी, एकाग्रता वाढवण्यासाठी आणि एकूण आरोग्यासाठी ते फायदेशीर मानले जाते.
भारतात आपण जेवणापूर्वी प्रार्थना करतो आणि जेवणानंतर आभार मानतो. त्याचप्रमाणे, जपानमध्ये तेथील लोकं जेवण सुरू करण्यापूर्वी ‘इतादाकिमासु’ आणि जेवणानंतर ‘गोचिसोसमा देशिता’ म्हणतात. हे दोन्ही अन्नाबद्दल कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी केले जातात.
जपानी लोकांची जीवनशैली आणि जेवण देखील साधेपणाने भरलेले आहे. सकाळी लवकर उठणे, निसर्गाचा आदर करणे, बूट आणि चप्पल काढून घरात अनवाणी जाणे आणि इतर अनेक सवयी साधेपणाने भरलेल्या आहेत. परंतु आजकाल, व्यस्त वेळापत्रक आणि इतर अनेक कारणांमुळे, दोन्ही देशांमधील काही लोकांच्या जीवनशैलीत बदल दिसून येत आहेत.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)