दोन पोळ्या आणि वाटीभर भात… तुम्हीही रोज असेच जेवताय? मग आजपासूनच बदला सवय, नाहीतर…
तुम्हीही रोजच्या जेवणात पोळी आणि भात एकत्र खाताय? सावधान! तज्ज्ञांच्या मते, आपल्या पारंपरिक थाळीतील ही एक चूक मधुमेह आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढवू शकते. निरोगी राहण्यासाठी ताट कसे संतुलित करावे, जाणून घ्या सविस्तर.

आपल्या भारतीय घरांमध्ये डाळ, पोळी, भाजी आणि भात याशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. वर्षानुवर्षे चालत आलेली ही खाण्याची परंपरा आपल्या संस्कृतीचा एक मुख्य भाग झाली आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे आता डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते हीच पारंपरिक थाळी चिंतेचा विषय बनली आहे. त्यातच आता पोळी आणि भात एकत्र खाण्याच्या सवयीमुळे तुमच्या रक्तातील साखर आणि लठ्ठपणा झपाट्याने वाढू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
डाळ, रोटी आणि भात खाण्यात नक्की काय अडचण आहे?
जयपूरमधील सीके बिर्ला हॉस्पिटलच्या वरिष्ठ आहारतज्ञ दिव्या जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही किती डाळ, पोळी किंवा भात खाता ही खरी समस्या नाही, तर तुम्ही ते किती प्रमाणात आणि कसे खाता ही खरी समस्या आहे. आजकाल भारत मधुमेहाचे केंद्र बनत आहे. त्यामुळे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ आपल्या रोजच्या खाण्याच्या सवयींवर आणि ताटातील अन्नपदार्थांच्या प्रमाणावर बारकाईने लक्ष ठेवून असतात.
आपल्या पारंपरिक थाळीमुळे कोणाला होऊ शकतो हानीचा धोका?
एका सामान्य भारतीय थाळीमध्ये सहसा भात, रोटी, बटाट्याचे भाजी, डाळ आणि प्रसंगी गोड पदार्थ यांचा समावेश असतो. हे सर्व पदार्थ कर्बोदकांनी (Carbohydrates) भरपूर असतात. जेव्हा तुम्ही एकाच जेवणात इतक्या मोठ्या प्रमाणात कर्बोदकांचे सेवन करता, तेव्हा तुमच्या शरीरावरील ग्लुकोजचा भार अचानक वाढतो. तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना आधीपासूनच प्री-डायबिटीज, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब किंवा इन्सुलिन प्रतिरोध यांसारख्या समस्या आहेत. त्यांच्यासाठी अशा प्रकारची अति-कर्बोदके असलेली थाळी अत्यंत धोकादायक ठरू शकते.
खाण्यापिण्याच्या बाबतीत आपल्याकडून कुठे चुका होत आहेत?
आजच्या आधुनिक जीवनशैलीत आपल्या आहाराबाबत काही प्रमुख चुका होत आहेत, ज्या आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. आपल्या ताटात मोठ्या प्रमाणात कर्बोदके असतात, पण त्यात प्रथिने (Proteins) आणि तंतुमय पदार्थ (Fiber) खूपच कमी असतात. अनेक लोक दोन-तीन पोळ्यांसोबत वाटीभर भात खातात. म्हणजेच एकाच वेळी दोन प्रकारची कर्बोदके शरीरात जातात.
कर्बोदकांच्या तुलनेत पनीर, दही, अंडी, मासे, चिकन किंवा घट्ट डाळी यांसारखे प्रथिनांचे पदार्थ खूप कमी प्रमाणात खाल्ले जातात. आहारातील मुख्य भाग असण्याऐवजी भाज्या केवळ चवीसाठी साइड डिश म्हणून वापरल्या जातात. पूर्वीच्या काळी लोक खूप शारीरिक कष्ट करायचे, त्यामुळे ते जे अन्न खायचे ते सहज पचायचे आणि त्यातून ऊर्जा खर्च व्हायची. आजकाल बहुतांश लोक ८-१० तास खुर्चीवर बसून काम करतात. शारीरिक हालचाल कमालीची कमी झाली आहे. त्यात प्रक्रिया केलेले अन्न वाढले आहे. अशा स्थितीत, शरीराला गरज नसताना मिळालेली अतिरिक्त कर्बोदके पचवणे कठीण होते.
आरोग्यदायी आणि पौष्टिक ताट कसे असावे?
तज्ज्ञांच्या मते, निरोगी राहण्यासाठी भाकरी किंवा भात पूर्णपणे सोडण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुम्हाला तुमचे ताट योग्य पद्धतीने संतुलित करता आले पाहिजे. त्यासाठी आपले ताट खालील तीन भागांमध्ये विभागण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात:
तुमच्या ताटाचा अर्धा भाग फक्त हिरव्या पालेभाज्या, शिजवलेल्या भाज्या आणि सॅलडने (फायबर) भरलेला असावा. तसेच तुमच्या ताटात घट्ट डाळ, पनीर, दही, अंडी, चिकन किंवा मासे यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा. यानंतर उरलेल्या ताटात पोळी किंवा भात असावा. नियमितपणे पोळी आणि भात दोन्ही एकत्र जास्त प्रमाणात खाणे टाळले पाहिजे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)