
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांचे पंख एकमेकांना धडकले असल्याची माहिती समोर आली आहे. लँडिंगच्या वेळी ही घटना घडल्याचे समोर आले आहे. हैदराबादवरून मुंबईला आलेले एअर इंडियाच्या विमानाचे पंख मुंबईवरू कोइंबतूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाच्या पंखांना धडकले. या घटनेवेळी दोन्ही विमानात प्रवाशी होते अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. डीजीसीएने या प्रकरणाची चौकशी केली असून दोन्ही विमान कंपन्यांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मुंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेवर बोलताना इंडिगो एअरलाईन्सने म्हटले की, 3 फेब्रुवारी 2026 रोजी हैदराबादहून मुंबईला आलेल्या आमच्या 6ई 791 या विमानाचे विंगटिप, लँडिंगनंतर टॅक्सींग करत असताना, दुसऱ्या एका एअरलाइनच्या विमानाला धडकले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि विमान पार्किंगमध्ये लावल्यानंतर ते खाली उतरले. विमानाची देखभाल तपासणी केली जात आहे. या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ माहिती देण्यात आली आहे आणि या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आमचे प्रवासी, कर्मचारी आणि विमानांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.
मुंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेवर एअर इंडियानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. एअर इंडियाने म्हटले की, 3 फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोईम्बतूरला जाणारे विमान AI2732, उड्डाणापूर्वी टॅक्सीवेवर थांबलेले असताना दुसऱ्या एका एअरलाइनच्या विमानाशी धडकले. दोन्ही विमानांच्या पंखांची टोके एकमेकांना घासली गेली, ज्यामुळे आमच्या विमानाच्या पंखाला नुकसान झाले आहे.
एअर इंडियाने पुढे म्हटले की, या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून, पुढील तांत्रिक तपासणीसाठी विमान थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले असून, आमचे ग्राउंड कर्मचारी त्यांना लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. आता या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणाला देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.