शेतकऱ्यावर मुंबईत कोण दादागिरी करतंय? शेतमाल विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची परवड तुमचाही संताप होईल…

नाशिकमधील एका शेतकऱ्याचा मुंबईतील येथील एक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. शेतकऱ्याने आपली मांडलेली परवड पाहून नेटकरी कारवाईची मागणी करत आहे.

शेतकऱ्यावर मुंबईत कोण दादागिरी करतंय? शेतमाल विक्रीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची परवड तुमचाही संताप होईल...
Image Credit source: Google
| Updated on: Mar 10, 2023 | 12:07 PM

नाशिक : सध्या सोशल मिडियावर एका शेतकऱ्याचा व्हिडिओ तूफान व्हायरल ( Farmer Video Viral ) होत आहे. शेतकरी नाशिकच्या लासलगाव जवळील दरसवाडी ( Nashik Farmer ) येथील शेतकरी आहे. गोविंद निवृत्ती डोंगरे या शेतकऱ्यांने त्याच्यासोबत घडलेला प्रसंग रेकॉर्ड करून व्हायरल केला आहे. द्राक्ष उत्पादक असलेले शेतकरी नाशिकहून मुंबईत गेले होते. नवी मुंबई परिसरात त्यांनी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना पाहून आपली पीकअप गाडी उभी केली होती. नागरिकांनीही शेतकरी स्वतः विक्रीसाठी आणलेला चांगले द्राक्ष पाहून खरेदी करण्यास सुरूवात केली होती. मात्र, त्याचवेळी स्थानिक पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी आले. त्यांनी शेतमाल कुणाला विकत आहात म्हणून विचारणा करत गाडीच्या चाकाला लॉक लावला आणि दंड भरा म्हणून सांगून निघून गेले.

शेतकऱ्याने वारंवार विनंती केली पण तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ऐकले नाही. विशेष म्हणजे शेतकरी हात जोडून त्यांना विनवणी करत होता. साहेब मी शेतकरी आहे. माझ्या नावावरच ही गाडी आहे. माझ्या नावाचा सातबारा उतारा सुद्धा आहे.

पण तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धुडकावून लावत ऐकून न घेता दंड भरावा लागेल पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये या म्हणून सूचना केली. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी यानंतर व्हिडिओ करून आपली झालेली परवड मांडली.

उन्हातान्हात विक्रीसाठी मुंबईत गेलेला शेतकरी अनेक तास आपल्या वाहनाजवळ तसाच बसून राहिला. मात्र तरीही पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठलीही परवा न करता शेतकऱ्याला नाहक त्रास दिला. शेतकऱ्यांनी थेट पाय पडण्याची भूमिका घेतली तरीही कायद्याची भाषा करत अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

शेतकऱ्याने यावेळी मागे पुढे न पाहता मग तुम्ही शेतकरी ते ग्राहक याचा अर्थ काय विचारला तरीही अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची बाजू धुडकावून लावत शेतमाल क्रेट ओढण्यास सुरूवात करत फोटो काढले, गाडीच्या चाकाला लॉक केले. एकूणच शेतकऱ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न सुरू केला.

मात्र, शेतकऱ्याने मला वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलायचे आहे म्हणत त्यांना ही गाठले. आणि संपूर्ण हकीकत सांगितली, तरीही त्या अधिकाऱ्यांनीही आमच्या हद्दीत माल विकता येणार नाही असे आदेश असल्याचे सांगत पुन्हा येऊ नका म्हणून सल्ला देत शेतकऱ्याला सोडून दिले.

शेतकऱ्याने याबाबतचा व्हिडिओ शेयर करत आपली व्यथा मांडली आहे. नेहमीच अशी दादागिरी शहरातील अधिकारी शेतकऱ्यांवर करत असतात, मात्र नाशिकच्या शेतकाऱ्याने या प्रकरणाला वाचा फोडली असून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होऊ लागली आहे.