टिपू सुलतान आमची प्रेरणा!तर छत्रपती शिवाजी महाराज… लग्न पात्रिका प्रचंड व्हायरल, वाचा नेमकं काय लिहिलं?

सध्या सोशल मीडियावर एक लग्न पत्रिका व्हायरल झाली आहे. या लग्न पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि टिपू सुल्तानचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

टिपू सुलतान आमची प्रेरणा!तर छत्रपती शिवाजी महाराज... लग्न पात्रिका प्रचंड व्हायरल, वाचा नेमकं काय लिहिलं?
Wedding Card
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 01, 2026 | 12:12 PM

सध्याच्या काळात जिथे सोशल मीडिया आणि राजकारणामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याच्या घटना वारंवार घडताना दिसतात, तिथेच अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून सामाजिक सलोख्याची एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. येथील एका मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान या दोन्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा ‘प्रेरणास्थान’ म्हणून उल्लेख करून नवा आदर्श पायंडा घालण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

वलगाव येथील एका कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू आहे. मात्र, या लग्नाची चर्चा वऱ्हाड्यांपेक्षा जास्त त्या पत्रिकेची होत आहे. या पत्रिकेवर हिंदू आणि मुस्लिम धर्मातील आदरणीय महापुरुषांचा उल्लेख करण्यात आला आहे. “हिंदू-मुस्लिम ऐक्य समोर नेण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे,” असे या कुटुंबाने ठामपणे सांगितले आहे.

टीकाकारांना चोख प्रत्युत्तर

या पत्रिकेवरून काहींनी समाजमाध्यमांवर टीका केली असली, तरी संबंधित कुटुंबाने आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्रामध्ये जे लोक हिंदू-मुस्लिम वाद पेटवत आहेत, त्यांना ही पत्रिका एक चोख उत्तर आहे. आम्ही नेहमीच सामाजिक ऐक्य जपण्याचे काम करत आलो आहोत. टीका करणाऱ्यांनी कितीही टीका करू द्या, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही.”

इतिहास आणि मराठी भाषेवर प्रेम

विशेष म्हणजे ही पत्रिका मराठी भाषेत छापण्यात आली आहे. यापूर्वीदेखील या कुटुंबाने अशाच प्रकारे मराठीतून पत्रिका छापून सर्वांची मने जिंकली होती. “जो खरा इतिहास आहे, तोच आम्ही पत्रिकेत मांडला आहे. सगळेच महापुरुष आमचे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या विचारांनीच समाज एकत्र येऊ शकतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सामाजिक सलोख्याचे उदाहरण

आजच्या धावपळीच्या आणि वादाच्या वातावरणात एका सामान्य कुटुंबाने उचललेले हे पाऊल अनेकांसाठी कौतुकाचा विषय ठरत आहे. धर्माच्या भिंती ओलांडून महापुरुषांच्या विचारांचा सन्मान करणे, हाच खऱ्या अर्थाने पुरोगामी महाराष्ट्राचा विचार आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वलगावमधील हे ‘ऐक्याचे लग्न’ आता केवळ दोन कुटुंबांना जोडणारे नसून, दोन समाजांतील दरी कमी करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून ओळखले जात आहे.

Follow Us