पृथ्वीराज चव्हाणांनंतर आता गोपीनाथ मुंडेंबाबत महादेव जाणकरांचा मोठा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना मोठं विधान केलं होतं. त्यावर आता महादेव जानकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल मोठं विधान केलं होतं. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. सोनिया गांधी यांनी देखील गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला होता, परंतु तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा या पक्ष प्रवेशाला विरोध होता, त्यामुळे पक्ष प्रवेश होऊ शकला नाही, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या विधानावर आता महादेव जानकर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. गोपीनाथ मुंडेंचा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार होता, गोपीनाथ मुंडे भाजपच्या जाचाला कंटाळले होते, असं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले जानकर?
एखादा व्यक्ती दिवंगत झाल्यानंतर ही गोष्ट आपण बोलणं बरोबर नाही. पृथ्वीराज चव्हाण ही चांगली व्यक्ती आहे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही, ते मोठे नेते आहेत. पण आज मुंडे साहेब हयात नाहीयेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल आता बोलणं योग्य नाहीये, एवढंच मला म्हणायचं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं हे मलाही नक्की माहिती नाही, परंतु त्यावेळी भाजपच्या जाचाला कंटाळून काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार गोपीनाथ मुंडे यांचा सुरू होता. परंतु काय घडलं हे नक्की मला सांगता येणार नाही, कारण मी त्या बैठकीला नव्हतो. मात्र एक गोष्ट नक्की की मुंडे साहेब हे भाजपच्या जाचाला कंटाळे होते, असं यावेळी महादेव जाणकर यांनी म्हटलं आहे.
चव्हाणांचा युटर्न
दरम्यान गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, परंतु या पक्ष प्रवेशाला मनमोहन सिंग यांचा विरोध होता, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या या वक्तव्यावरून युटर्न घेतल्याचं पहायला मिळत आहे, मी चुकलो असं त्यांनी म्हटलं आहे. संसदीय परंपरेप्रमाणे पक्षात कोणाला घ्यायचं याचे अधिकार हे पक्षाध्यक्षांचे असतात, तर मंत्री कोणाला करायचं याचे अधिकार हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे असतात, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.