Ajit Pawar Death : अखेर भावासाठी भाऊ धावला… राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात… अजितदादा अमर रहेच्या घोषणा; शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाला एक महिना होत असताना घातपाताचा संशय बळावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी व्हीएसआर कंपनी व DGCA विरोधात सखोल चौकशीची मागणी केली आहे. मुंबईत तक्रार नाकारल्यानंतर, आता बारामतीत गुन्हा दाखल होणार असून अजितदादांच्या समर्थकांनी न्यायासाठी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन सुरू केले आहे.

Ajit Pawar Death : अखेर भावासाठी भाऊ धावला... राजेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात... अजितदादा अमर रहेच्या घोषणा; शेकडो कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन
अजित पवार विमानअपघात मृत्यू प्रकरण
| Updated on: Feb 26, 2026 | 11:33 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख , राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आत महीना होत आला आहे. गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीसह अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला. पवार कुटुंबियांचा शोकाकूल चेहरा पाहून तर सर्वांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. दरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातापाताने घडवला अशी शंका गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. अजित पवार यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तर हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून ज्या विमानाचा अपघात झाला,  त्याची कंपनी व्हीएसआर यावरही त्यांनी संशयाचे बोट उठवले.

गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे या मुद्यावरून सातत्याने बोलत असून या अपघाताची सविस्तर चौकशी व्हावी, व्हीएस कंपनीचे मालक, काही सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध या विषयांवरही त्यांनी अनेक पुरावे मांडून संशय व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणात आता रोहित पवार यांनी मोठं पाऊल उचललं असून त्यांनी डीजीसी विरोधातच गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. काल रोहित पवार व व अमोल मिटकरी हे मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन येथे गेले होते. अजित पवार विमान अपघात प्रकरणात डीजीसीए विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ते तिथे दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत तेथे पोहोचले. मात्र पोलिसांनी डीजीसीएविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची बाचाबाची झाली. ते काहीसे आक्रमक झालेले दिसले.

आज बारामती पोलिस ठाण्यात तक्रार करणार दाखल

पोलिसाशी  वाद झाल्यानंतर अखेर रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. आज सकाळी रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे चुलत बंधू, राजेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्याजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवार यांचे हजारो समर्थक, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी , न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो समर्थक, कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केलं. अजित पवार यांची पोस्टर्स घेऊन सर्वांनी पोलिस ठाण्यासमोर अक्षरश:ठिय्या दिला. न्यायासाठी , सत्यासाठी आपण आलो असल्याची भूमिका सर्वांनी मांडली आहे.

कार्यकर्त्यांच्या घोषणांना दणाणला परिसर 

अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे… रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही अशा विविध घोषणांनी पोलिस स्टेशनचा परिसर दुमदुमून गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. ज्या विमानामुळे अजित दादांचा मृत्यू झाला, त्या विमान कंपनीवर बंदी आलीच पाहिजे, अजित दादांना, आम्हा बारामतीकरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, समर्थक करताना दिसले.

ब्लॅकबॉक्स टमटमने पाठवलाय का ?

25 ते 30 लाख लोकांमधून एक चांगला नेता तयार होतो. अजित दादांसारखा नेता एका दिवसात तयार होत नाही, त्यासाठी 50-60 वर्ष जातात.  त्यांच्या जाण्याने फक्त कुटुंबाचंच नुकसान झालेलं नाही, तर महाराष्ट्राच्या जनतेचा मोठा तोटा झाला आहे अशा शब्दांत भावनाविविश कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. काल मुंबईत गुन्हा दाखल झाला नाही, आज बारामतीत सुद्धा जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही महाराष्ट्र बंद करण्याच्या तयारीत आहोत, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला.

फक्त चौकशी सुरू आहे, असं सांगता, महिनाभर झाली तरी घटनेची चौकशी कसली करताय, ती कंपनी कोणाची, त्यांची कोणाशी मिलीभगत आहे हे खरंच शोधताय की काही नवा कट आखताय, वेगळं काही चित्र दाखवायचं आहे का असा प्रश्न आमच्या मनात आहे, अशा शब्दांत संतापलेल्या कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला.

अपघातानंतर त्या विमानाचा ब्लॅकबॉक्स मिळाला, तपासणीसाठी तो ब्लॅकबॉक्स अमेरिकेला पाठवायचं म्हणतात हे लोकं, तो काय टमटममध्ये पाठवला आहे का ? इतके दिवस कसे लागतात ? आज एखादा माणूस एका दिवसात अमेरिकेत जाऊ शकतो, मग ब्लॅकबॉक्सचं सत्य पुढे यायला एवढा वेळ का, तो काय टमटमने तिकडे पाठवलाय का ? असा उपरोधिक सवाल समर्थाकांनी विचारला.