
महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघातात अजित दादांचा मृत्यू झाल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित दादांच्या निधनाला ४ आठवडे उलटले आहेत. तरीही अद्याप अनेक लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. तर दुसरीकडे अजित दादांचा अपघात की घातपात असा संशय व्यक्त करत आहेत. आता अजित दादांच्या आठवणीत एका शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
मुंबईत वरळी एनएससीआय डोममध्ये अजित पवारांच्या आठवणीत एका विशेष शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक व्यक्तींनी त्यांच्या योगदानाचा गौरव करत, त्यांच्या जाण्याने पक्षाची आणि समाजाची न भरून निघणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. या सभेला वरळीतील स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे अनेक दिग्गज नेते आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर याचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबतच एक भावूक पोस्टही शेअर केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण प्रत्येकाच्या मनात दाटून आली होती.
दादांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे कणखर नेतृत्व, अचूक निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेली जिव्हाळ्याची नाळ यांचा विलक्षण संगम होता. बारामतीपासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत विकासाचा ध्यास घेऊन दिवस-रात्र झटणारा हा लोकनेता आज आपल्यात नाही, ही जाणीव उपस्थितांच्या प्रत्येक शब्दातून प्रकर्षाने जाणवत होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, कार्यकर्ते आणि असंख्य नागरिकांनी दादांबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना डोळे पाणावले, हीच त्यांच्या आयुष्यभर कमावलेल्या अपार प्रेमाची जिवंत साक्ष आहे.
दादांनी रुजवलेली कामाची शिस्त, दूरदृष्टीतून आखलेला विकासाचा मार्ग आणि लोकहितासाठीची अखंड तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे. त्यांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी नव्या जोमाने कार्यरत राहणे, हीच त्यांना वाहिलेली सर्वोच्च श्रद्धांजली ठरेल, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभेत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना अत्यंत हळव्या शब्दांत व्यक्त केल्या. सभागृहात दादांच्या कार्याची, त्यांच्या जिव्हाळ्याच्या स्वभावाची आणि राज्यासाठी त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांची आठवण… pic.twitter.com/g4mRN7bFSW
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) February 23, 2026
दरम्यान कालपासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवारांचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रोहित पवार, भास्कर जाधव यांसह अनेकांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.