
महाराष्ट्राचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ ‘लिअरजेट ४५’ (Learjet 45) या विमानाला झालेल्या भीषण अपघातात अजित पवारांसह अन्य चार सहकाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या विमान अपघाताच्या चौकशीला आता वेग आला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) या प्रकरणाचा प्राथमिक तपास अहवाल येत्या २८ फेब्रुवारी २०२६ पूर्वी प्रसिद्ध केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा केली आहे.
आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) नियमांनुसार, कोणत्याही विमान अपघातानंतर ३० दिवसांच्या आत प्राथमिक माहिती सादर करणे बंधनकारक असते. त्यानुसार एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ही संस्था या दुर्घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी दिवसरात्र काम करत आहे. या अहवालातून विमानाची तांत्रिक स्थिती, हवामानाचा अंदाज आणि वैमानिकाचे शेवटच्या क्षणांतील निर्णय यावर अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या अहवालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
२८ जानेवारी रोजी सकाळी ८:१८ वाजता विमानाचा बारामती एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) शी संपर्क झाला. सकाळी ८:४३ वाजता विमान उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमान धावपट्टीच्या सुरुवातीलाच कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवारांचा पुतण्या आमदार रोहित पवार यांनी या अपघातात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच वैमानिकाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ३००० फूट दृश्यमानता असतानाही विमान का कोसळले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनीही सोशल मीडियावरून सत्य समोर आलेच पाहिजे अशी भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधील माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान या भीषण अपघाताने केवळ पवार कुटुंबच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आता सर्वांच्या नजरा २८ फेब्रुवारीला प्रसिद्ध होणाऱ्या AAIB च्या प्राथमिक अहवालाकडे लागल्या आहेत. यातून ब्लॅक बॉक्समधून मिळणारी विमानाची तांत्रिक माहिती आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा शेवटचा संवाद, या प्रकरणातील संशयाचे धुके दूर करण्यास मदत करेल. हा अपघात निव्वळ एक तांत्रिक त्रुटी होती की त्यामागे आणखी काही गंभीर कारण दडलेले आहे, याचे उत्तर या अधिकृत अहवालातून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.