
मुंबईः भाजपने (BJP) सुरु केलेल्या अनेक विकासाच्या योजना (Development Scheme) सध्याच्या राज्य सरकारने बंद पाडल्या आहेत. सरकारचं मंत्रालय बंद असून दुकानदारी तेवढी सुरु आहे, असा शाब्दिक हल्ला भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. मुंबईत भाजप पक्ष कार्यालयात (BJP Office, Mumbai) त्या बोलत होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, संपूर्ण दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु होतं. कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात गेली. पण या सरकारला अहंकार आहे. त्यांना कर्मचाऱ्यांचं उपोषण, त्यांची आंदोलनं दिसून येत नाहीत. आम्ही अनेक ठिकाणच्या आंदोलनाला भेट दिली. सरकारशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा चर्चेचा सूरच नकारात्मक आहे. चर्चेतून हा मुद्दा सोडवता येऊ शकतो, पण सरकार या सकारात्मक विचार करत नाही, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.
सध्याच्या महाविकास आघाडी सरकारने सरकार चालवण्याऐवजी दुकानदारी चालवायचं ठरवलंय, असं चित्र असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. भाजपने हाती घेतलेली मराठवाड्यातील वॉटरग्रिड योजना सरकारने बंद पाडली. जलयुक्त शिवार बंद केली. त्यामुळे सरकारचं मंत्रालय बंद आणि दुकानदारी सुरु आहे, असं वाटतंय. राज्यातील मुख्यमंत्री पदानंतर असलेल्या महत्त्वाच्या पदांवरील मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपात बरबटलेले आहेत. गृहमंत्र्यांनीच एवढा भ्रष्टाचार केला असेल तर जनतेनेही या सरकारकडून कोणत्या तोंडाने अपेक्षा करावी, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.
इतर बातम्या-