…तर सर्वात आधी आम्ही सरकारच्या पाठिशी उभं राहू, अमित ठाकरेंची ती पोस्ट चर्चेत, केली मोठी मागणी

नीट पेपर फुटी प्रकरणानंतर देशभरात वातावरण चांगलच तापलं आहे, याच प्रकरणात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागला, दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांनी एक पोस्ट केली आहे.

...तर सर्वात आधी आम्ही सरकारच्या पाठिशी उभं राहू, अमित ठाकरेंची ती पोस्ट चर्चेत, केली मोठी मागणी
Amit Thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 13, 2026 | 10:04 AM

देशभरात सध्या नीट पेपर फुटीप्रकरणावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने तब्बल महिनाभर दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात आलं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला, त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, दरम्यान आता नीट परीक्षाचा मुद्दा पकडून मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुकवर एक पोस्ट  केली आहे, ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

नेमकं काय म्हणाले अमित ठाकरे?

‘काही दिवसांपूर्वी तामिळनाडूच्या विधानसभेत एक खूप मोठा निर्णय झाला. तिथल्या सरकारने ‘नीट’ (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करून बारावीच्या गुणांवरच वैद्यकीय प्रवेश देण्याचा ठराव मांडला.

विशेष म्हणजे, हा ठराव मांडल्यावर विरोधी पक्षातल्या एकाही आमदाराने उगाच विरोधाला विरोध केला नाही. डावे असोत की इतर विरोधी पक्ष, सगळ्यांनी आपापले झेंडे, राजकीय मतभेद आणि ईगो बाजूला ठेवून या निर्णयाला एकत्रितपणे पाठिंबा दिला. याचं कारण म्हणजे, तिथे प्रत्येकाला एकच गोष्ट स्पष्ट होती, हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, त्यांच्यासाठी एकत्र येणं हे कोणत्याही पक्षाच्या राजकारणापेक्षा कितीतरी पट महत्त्वाचं आहे! फक्त भाजपच्या एका आमदाराने विरोध करत पळवाट काढली, पण विधानसभेतील बाकी सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जनतेच्या प्रश्नांवर राजकारण बाजूला कसं ठेवायचं, याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं. हा ठराव पुढे राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे टिकेल की नाही हा कायदेशीर भाग झाला, पण राज्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व पक्षांनी दाखवलेली ही ‘एकजूट’ सर्वात जास्त महत्त्वाची आहे!

आज जो निर्णय तामिळनाडू राज्य सरकारने घेतलाय, तोच निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने वर्षांपूर्वीच घ्यायला हवा होता. राजसाहेबांनी २०१६ मध्येच ठणकावून सांगितलं होतं की, ‘नीट’ ही परीक्षाच मुळात निरुपयोगी आहे आणि ती महाराष्ट्रातील ग्रामीण आणि मराठी विद्यार्थ्यांचा बळी घेण्यासाठी आणली गेलेली आहे! पण आपल्याकडच्या सत्ताधाऱ्यांना तेव्हाही कोणाचं ऐकायचं नव्हतं आणि आजही ऐकायचं नाहीये.

आज महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी अवस्था होण्याचं कारण म्हणजे इथे सत्ताधाऱ्यांना सत्तेची आणि बहुमताची अशी नशा चढलीय की, त्यांना जनतेशी उत्तरदायित्वच राहिलेलं नाहीये! MPSC असो, TET पेपरफुटी असो, तलाठी भरतीतील घोटाळे असो की शाळा-कॉलेजेसमध्ये मूलभूत सुविधांची दुरावस्था… विरोधक म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा काही मांडतो, तेव्हा त्याला फक्त ‘राजकीय विरोध’ म्हणून धुडकावून लावलं जातं! सत्ताधाऱ्यांच्या या ‘राजकीय अहंकारामुळे’ आज महाराष्ट्रातील लाखो तरुण-तरुणींचं आयुष्य उध्वस्त होत चाललंय! राजकारण हे शेवटी लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी असतं; हेच काही राजकारणी विसरून गेले आहेत.

आम्हाला निव्वळ राजकारण करायचं नाहीये आणि आम्ही विरोधासाठी विरोध करणारे राजकारणी नाही आहोत! उद्या सरकारने जर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या किंवा मराठी माणसाच्या हिताचा एखादा खरोखर चांगला निर्णय घेतला, तर आम्ही सर्वात आधी या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहू, आणि आम्ही हे याआधीही केले आहे!
पण त्यासाठी या सरकारने आधी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला पाहिजे आणि विरोधकांना डावलण्याची वृत्ती सोडली पाहिजे.

‘महाराष्ट्रात समाजकारण उरलेच नाही, फक्त सत्ताकारणाचा आणि दडपशाहीचा खेळ सुरू आहे!’ असे जनतेला वाटू देऊ नका. आता तरी सत्ताधाऱ्यांनी तामिळनाडूकडून धडा घेऊन एकत्र येण्याची हिंमत दाखवा.

कारण, महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर!

– अमित राज ठाकरे’  असं अमित ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us