Gen Z आंदोलनावर राकेश टिकैत यांचा मोठा गौप्यस्फोट! कोणी पुरवली जंतरमंतरवर ताकद? भाजपला मोठा इशारा
Rakesh Tikait on Gen Z: नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथील 'जेन झी' विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी अकोल्यात मोठा गौप्यस्फोट केला.

पेपरफुटीविरोधात नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या ‘जेन झी’च्या आंदोलनाला ताकद पुरविल्याचा गौप्यस्फोट भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी केला आहे. तर ते अकोल्यात ‘शेतकरी जागर मंचा’ने आयोजित केलेल्या अमेरिका आणि भारत व्यापार कराराविरोधातील ‘आक्रोश सभे’त बोलत होते. दिल्लीला मोठा आवाजच समजतो आणि ती त्याच आवाजाला ती घाबरते, असं टिकैत म्हणालेत. तर यामुळेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचं ते म्हणालेत. CJP ने नीट युजी परीक्षेतील घोटाळा, तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी जंतरमंतरवर 35 दिवस आंदोलन केले होते. तर सोनम वांगचुक यांनी 26 दिवस उपोषण केले होते. या आंदोलनावर 20 जुलै रोजी लाठीचार्ज झाला होता. त्यानंतर आंदोलनाचे लोण देशभर पोहचले. देशभरात सरकारविरोधात आंदोलन पेटले. सरकारने प्रधान यांचा राजीनामा घेतला आणि सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत मंजूर केले.
विरोधी पक्षांवर टिकैत यांची टीका
केंद्रातील सत्तेविरोधात विरोधी पक्ष मिळमिळीत भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर यासोबतच केंद्रातील सरकार हे हुकूमशाही प्रवृत्तीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पुढच्या काळात देशभरात शेतकऱ्यांचं आंदोलन उभारण्यासाठी देशव्यापी दौरा करीत असल्याचं ते म्हणालेत. आणि यासोबतच उत्तर प्रदेशातील मागच्या विधानसभा निवडणुकीतील मतमोजणीवेळी शेतकऱ्यांची ताकद जागरूक राहिल्यानेच भाजपच्या जागा कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
‘एक जिल्हाधिकारी, एक खासदार’ हे भाजपचे सूत्र
दरम्यान, सध्याच्या निवडणूक प्रणालीवर प्रहार करताना त्यांनी ‘एक जिल्हाधिकारी, एक खासदार’ हा भाजपचा सध्याचा फार्मूला असल्याच म्हटल आहे. तर आता आगामी निवडणुकीत हाच फॉर्मुला भाजपचे उमेदवार अविरोध निवडून देण्याचा राहणार असल्याचं ते म्हणालेत. तर यासाठी विरोधकांना धमकावण्याचा आणि त्यांच्या मालमत्तांवर बुलडोजर चालवण्याचं धोरण भाजप राबवणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
शेतकरी आंदोलनाची धग कायम
यावेळी टिकैत यांनी सरकारला मोठा इशारा दिला. दिल्लीतील शंभु बॉर्डरवर हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनाची आठवण करून देत त्याची धग कायम असल्याचे टिकैत यांनी सांगितले. शेतकरी आंदोलन संपलेले नसल्याचा इशारा त्यांनी दिला. किमान आधारभूत किंमत(MSP) कायदेशीर हमी देण्यासाठीचा लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्यानेच त्यांची आर्थिक स्थिती खालावल्याचा दावा टिकैत यांनी दिला. येत्या काही दिवसात शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहणार का? अशी चर्चा होत आहे.