Sanjay Raut: ढोकला, फाफडा आणि शेवगाठी… संजय राऊतांचा मोदी-शिंदे भेटीवर जिव्हारी टोला
Sanjay Raut on Eknath Shinde-Narendra Modi: खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून टीकास्त्र डागले आहे. या बैठकीत किती खासदार फोडलेत आणि किती फोडणार हीच चर्चा होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून टीकास्त्र डागले आहे. या बैठकीत किती खासदार फोडलेत आणि किती फोडणार हीच चर्चा होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला. कायद्याचा भंग करून, पक्षांतर करून जे लोकं एका चिन्हावर निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात. त्यांच्याबरोबर हे पंतप्रधान ढोकला, फाफडा आणि शेवगाठी खाणार आहेत. ही आपल्या पंतप्रधानांची लायकी, अशी बोचरी टीका त्यांनी केली.
जसा राजा, तशी प्रजा
देशाच्या पंतप्रधानांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. पंतप्रधानांनी राजकीय फुटरीतेला आणि पक्षांतराला निदान थेट अशी प्रतिष्ठा देऊ नये. एक भूमिका त्यांनी स्वीकारायला हवी. जसा राजा, तशी प्रजा निर्माण होते. हे 50 50 कोटीला माणसं विकत घेतली. त्यांच्यासोबत तुम्ही गुल छबुगिरी करणार. या देशाचं झालेलं हे अधःपतन आणि घसरगुंडी आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
अजून किती फोडणार?
एकनाथ शिंदे हे दरेगावमधून थेट दिल्लीला जाणार असल्याची चर्चा आहे. उद्धव सेनेतून फुटलेले सहा खासदार आणि तृणूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रेकफास्ट करणार असल्याचे समजते. त्यावर खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. तू किती फोडले आणि अजून किती फोडणार? याच्या पलिकडे दोघात चर्चे होईल असे वाटत नाही. हॅ हॅ करून हसणार. अदानीला महाराष्ट्रात कुठल्या प्रॉपर्ट्या द्यायच्या आहेत. उद्योगपतींना अजून काही विकता येईल का? बीईएसटी विकायला काढली आहे. मेट्रो अंबानींनी विकत घेतली आहे. अशी दोघांमध्ये चर्चा होईल अशी टीका राऊतांनी केली.
संसदेचे विशेष अधिवेशनावर प्रतिक्रिया
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे. मी या सरकारने निर्लज्जपणा कळस गाठला आहे. या सरकारचे 240 खासदार जनतेने निवडून दिले आहेत. 240 चे 300 खासदार कसे झालेत याचे उत्तर त्यांनी द्यायला हवे. हे वरचे खासदार कुठून आणले. ते फोडले, ते चोरले आता काही पक्ष फोडण्यासाठी त्यांनी माणसं कामाला लावली आहे. तो आकडा गाठल्यानंतर ते डिलिमिटेशन बिल आणतील. या देशाचं जे राजकारणाच्या प्रतिष्ठेची घसरगुंडी उडाली आहे. गेल्या 12 वर्षात ही सर्वाधिक घसरगुंडी उडाली आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
