शिंदे गटात असलेल्या बच्चू कडू यांच्याकडून धडकी भरवणारं वक्तव्य, म्हणाले, “ज्यांनी उठाव केला…

आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार सत्तेत आल्यानंतर शिवसेना आमदारांमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाची काय अवस्था आहे हे नमूद करणारं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तसेच त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे गटाला धडकी भरेल असंच वक्तव्य केलं आहे.

शिंदे गटात असलेल्या बच्चू कडू यांच्याकडून धडकी भरवणारं वक्तव्य, म्हणाले, ज्यांनी उठाव केला...
Image Credit source: tv9
Chetan Patil | Updated on: Jul 05, 2023 | 8:32 PM

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात धुसफूस सुरु झाल्याची माहिती समोर आलेली. शिंदे गटाच्या आमदारांकडून याबाबत नाराजी देखील व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शिंदे गटाच्या गोटात बैठकांचं सत्र सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार बच्चू कडू यांनीदेखील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सूचक वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सामील झाला तेव्हा त्याची शिंदे गटाला कल्पना देणं महत्त्वाचं होतं, असं मत बच्चू कडू यांनी मांडलं आहे. तसेच ज्यांनी उठाव केला त्यांच्या डोक्यावर कुऱ्हाड मारण्याचं काम होऊ नये, असंही ते म्हणाले आहेत.

“हे थोडं चुकीचं घडलंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जेव्हा सत्तेत आला तेव्हा त्याचा विचार विनिमय, मंथन, चर्चा व्हायला हवी होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या सर्व आमदारांची आता गोची झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्रास होता. कामं होत नव्हती”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘ज्यांनी उठाव केला त्यांच्याच डोक्यावर कुऱ्हाड मारण्याचं काम…’

“राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेनेचा मतदारसंघ फोडून त्यांच्या पक्षबांधणीचं काम सुरु होतं, असा आरोप होता. त्या आरोपालाच आता छेद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या माध्यमातून ज्यांनी उठाव केला त्यांच्याच डोक्यावर कुऱ्हाड मारण्याचं काम होऊ नये. हे जपणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांचं आयुष्य पणाला लावता कामा नये. हे जपणं भाजपची फार गरज आहे. सत्तेसाठी असं काही होऊ नये”, असं शिंदे गटाला धडकी भरवणारं मोठं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे.

‘खरा प्रश्न हा विचारधारेचा आहे’

“खरंतर प्रश्न हा शरद पवार यांच्या निवृत्तीचा नाहीय, तर विचारधारेचा आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा आहे आणि भाजपची वेगळी विचारधारा आहे. या विचारधारेची ही लढाई आहे. राष्ट्रवादीची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची आहे. तर भाजपची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे. प्रश्न युतीचा नाही तर विचारांचा आहे. पक्षाची आज जी काही विभागनी झालीय त्याचं दु:ख शरद पवार यांना असेल”, असं बच्चू कडू म्हणाले.

‘मी पवारांचं सांत्वन करतो’

“एवढा मोठा पक्ष उभा करणं लहान गोष्ट नाही. आम्ही अजित पवार यांच्या बाजूने असलो तरी शरद पवार यांच्या कारकिर्दीला जो वैचारिक फाटा बसलाय त्याचं दु:ख त्यांना असेल. मी त्यांचं सांत्वन करतो”, असंही बच्चू कडू म्हणाले.

‘सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी उठाव केला’

“हा उठाव सर्वात आधी उद्धव ठाकरे यांनी केला. ते भाजपसोबत युतीत निवडणूक लढले. पण नंतर त्यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातसोबत महाविकास आघाडी स्थापन करत सरकार प्रस्थापित केलं. ते मुख्यमंत्री बनले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उठाव केला. आता अजित पवार यांनी उठाव केला. या सगळ्या उठावाचं पिताभिष्म शरद पवार हेच आहेत. त्यांनी हे उठाव बरेच केले आहेत”, असा दावा कडू यांनी केला.

‘अजित पवार यांनी घेतलेलं पाऊल निश्चितच अभिनंदनीय’

“शरद पवार यांच्यासाठी हे नवीन नाही. पण आता एवढ्या मोठ्या वयात जेव्हा अशा घडामोडी घडतात तेव्हा थोडी चिंता आम्हालाही आहे. या सगळ्या बदलत्या राजकारणात अजित पवार यांनी घेतलेलं पाऊल निश्चितच अभिनंदनीय आहे. पक्ष वाचायला पाहिजेत, माणसं वाचली पाहिजेत, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच त्यांनी पाऊल टाकलं असेल”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us