अमरावती दंगल प्रकरण, दोन वर्षांनंतर लागला निकाल, निकालात नेमकं काय?

| Updated on: Aug 05, 2023 | 6:43 PM

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सहा वेळा लाठीचार्ज करावा लागला. यात भाजप नेत्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अमरावती दंगल प्रकरण, दोन वर्षांनंतर लागला निकाल, निकालात नेमकं काय?
Follow us on

अमरावती : त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ 12 नोव्हेंबर 2021 रोजी रजा अकादमी इस्लामिक फेडरेशन संघटनेतर्फे अमरावती येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यातील लोकं आक्रमक झाले. मोर्चेकरांनी दुकानांची तोडफोड केली. या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 नोव्हेंबर रोजी भाजपा आणि हिंदू संघटनांनी अमरावती शहर बंद केले. यानिमित्त काढण्यात आलेल्या मोर्च्यात अमरावतीतील राजकमल चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाला संबोधित केले. शहराचे भाजपा नेते आमदार प्रवीण पोटे, खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय, माजी आमदरा जगदीश गुप्ता यांनी मोर्च्याला मार्गदर्शन केले.

पोलिसांना करावा लागला होता लाठीचार्ज

बंदच्या आवाहनानंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक झाली. भाजपच्या आंदोलनाला हिसंक वळण लागले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सहा वेळा लाठीचार्ज करावा लागला. यात भाजप नेत्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायालयात हे प्रकरण पोहचले. न्यायालयाने दोनच वर्षात या प्रकरणाचा निकाल लावला. सर्व भाजप नेत्यांसह ३० जणांची निर्दोष मुक्तता केली.

सहा साक्षीदार तपासले

भाजपा व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर विविध कलमान्यवये गुन्हा दाखल करण्यात आला. खासदार अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, माजी आमदार जगदीश गुप्ता, भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, तुषार भारतीय आणि इतर भाजप कार्यकर्ता विरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी सहा साक्षीदार तपासण्यात आले.

यांनी केला युक्तिवाद

आरोपींतर्फे ॲड. प्रशांत देशपांडे यांनी संपूर्ण कामकाज पाहिले. सर्व साक्षीदारांची उलट तपासणी आरोपीतर्फे अॅड. प्रशांत देशपांडे यांनी घेतली. अॅड. मोहित जैन, अॅड. गणेश गंधे यांनीही जोरदार युक्तिवाद केला. महाविकास आघाडी सरकारने भाजपाविरोधात ही कारवाई केल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये होते. हिंदुत्ववादी कार्यकर्त्याविरुद्ध सुडाच्या भावनेने हा गुन्हा दाखल झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता.

३० आरोपींची निर्दोष सुटका

अमरावती दंगल आरोपातून भाजपा नेत्यांसह सर्व 30 आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे. 2 वर्षानंतर निकाल लागला. या निकालावर अनिल बोंडे, प्रवीण पोटे, शिवराय कुळकर्णींसह भाजप नेते समाधानी आहेत.