अर्णव गोस्वामींना तीन दिवस आधी हल्ल्याची माहिती कशी?; केंद्राने उत्तर द्यावं: अनिल देशमुख

| Updated on: Jan 23, 2021 | 12:02 PM

अनिल देशमुख यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. (anil deshmukh reaction on arnab goswami whatsapp chat)

अर्णव गोस्वामींना तीन दिवस आधी हल्ल्याची माहिती कशी?; केंद्राने उत्तर द्यावं: अनिल देशमुख
अनिल देशमुख, गृहमंत्री, महाराष्ट्र
Follow us on

नागपूर: बालाकोट आणि पुलवामा हल्ल्याची माहिती जाहीर होणं ही चिंताजनकबाब आहे. पत्रकार अर्णव गोस्वामी यांना या हल्ल्याची माहिती तीन दिवस आधी कशी मिळाली? केंद्र सरकारने याबाबत उत्तर दिलं पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. (anil deshmukh reaction on arnab goswami whatsapp chat)

अनिल देशमुख यांनी आज नागपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. 26 फेब्रुवारी 2019ला बालाकोटमध्ये हल्ला झाला. अर्णव गोस्वामी यांना 23 तारखेला ही बातमी कळली. त्यांना तीन दिवस आधी ही माहिती कशी मिळाली. हल्ल्याची माहिती केवळ चारपाच महत्त्वाच्या नेत्यांनाच असते. केंद्रीय मंत्र्यांनाही ही माहिती नसते. मग अर्णव यांना ही माहिती कशी मिळाली? हा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रश्न असून अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर केंद्र सरकारने उत्तर दिलं पाहिजे, असं देशमुख म्हणाले.

बडे बॉस को चुनाव में फायदा होगा

अर्णव यांच्या चॅटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. बालाकोट हल्ले से चुनाव का वातावरण बदल जायेगा और बडे बॉस को फायदा होगा, असं अर्णव यांनी या चॅटमध्ये म्हटलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. अर्णव यांच्या प्रकरणात काय कारवाई करता येईल, याबाबत आम्ही लीगल ओपिनियन मागवलं आहे. कायदेशीर सल्ला आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सोनिया गांधींची टीका

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काल शुक्रवारी काँग्रेस कार्य समितीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी त्यांनी अर्णव गोस्वामी यांचं नाव न घेता त्यांच्यावर हल्ला चढवला. गेल्या काही दिवसात आपण धक्कादायक बातम्या वाचल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेशी कशा पद्धतीने खेळल्या जातयं हे आपण पाहिलं आहे. जे लोक दुसऱ्यांना देशभक्ती आणि राष्ट्रवादाचे प्रमाणपत्रं देत होते. त्यांचा पूर्णपणे पर्दाफाश झाला आहे, असा हल्ला सोनिया गांधी यांनी चढवला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा अत्यंत गंभीर विषय आहे. गेल्या काही दिवसात गोपनीय माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून केंद्र सरकारने मात्र त्यावर मौन बाळगलं आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. (anil deshmukh reaction on arnab goswami whatsapp chat)

 

संबंधित बातम्या:

अर्णव गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का?, गृहमंत्र्यांनी भाष्य करावं; संजय राऊतांचं आवाहन

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

(anil deshmukh reaction on arnab goswami whatsapp chat)