लोक सकाळी टीव्ही बंद ठेवतात, कारण सीरियल किलर वेड्यासारखा बडबडतो; आशिष शेलार यांची जहरी टीका
देशात संविधान नाही, कायद्याचं अस्तित्व नाही, हम करे सो कायदा अशी स्थिती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली, या टीकेनंतर आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
मुंबई : रात्री 9.30 ला लोकं टीव्ही लावतात कारण त्यांना सिरियल बघायची असते. लोक सकाळी 9.30 टीव्ही बंद करतात कारण एक सिरियल किलर येड्यासारखा बडबडबतो. म्हणून लोक टीव्ही बंद करतात, अशी खोचक टीका भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिनानिमित्त मुंबईतील एका कार्यक्रमात आशिष शेलार बोलत होते. तर हिंमत असेल तर संजय राऊत यांनी माझ्या घराखाली यावं, त्यांना मी 40 लोकांचे सर्टिफिकेट देतो, असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलंय.
आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?
देशात संविधान नाही, कायद्याचं अस्तित्व नाही, हम करे सो कायदा अशी स्थिती असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. तसेच बाबासाहेब आंबेडकरांना जर श्रद्धांजली वहायची असेल तर पुन्हा एकदा कायद्याचं राज्य प्रस्थापित करणे गरजेचे आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. त्यावरून आशिष शेलार यांनी टीका केली. ते म्हणाले, लोकशाही धोक्यात आहे असा अपप्रचार किमान संजय राऊत यांनी करू नये. संविधानामुळे ते आज जामिनावर आहेत. काही लोकांना अंतरीम सुरक्षा वाढवून मिळत आहे. ज्यांना ही सुरक्षा वाढवून मिळतेय त्यांच्यावर पण आमचे लक्ष आहे, असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.
वरळीत मोठा लेजर शो
आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघावर भाजपचं विशेष लक्ष आहे. या मतदार संघातून भाजपचाच उमेदवार विजयी झाला पाहिजे, यासाठी मोठे प्लॅन आखले जात आहेत. याचाच एक भाग म्हणजे वरळीत लेजर शो आयोजित करण्यात आलाय. मात्र हा राजकीय अजेंड्याचा भाग आहे, असं शेलार यांनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले, ‘ समस्त भारतीयांना साजरा करायचा दिवस आहे. स्वातंत्र्य समता बंधुता असा संदेश ज्यांनी दिला, त्या बाबासाहेब यांची जंयती जल्लोषात साजरी होत आहे. आम्ही वरळीत भव्य लेझर शो करत आहोत. यात्रा काढतोय. वरळीत लेझर शो करण्याचे विशेष राजकीय कारण नाही. जांबोरी मैदानात समाज एकत्रित येतो. तो भाग मध्यवर्तीय आहे. त्यामुळे तिथे कार्यक्रम घेत आहोत, असंही शेलार यांनी स्पष्ट केलंय.