मंदिरात काळोखी खोली अन् त्यात…; भोंदू बाबा अशोक खरातचे मोठे रहस्य उलगडणार

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आज अशोक खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊस आणि मंदिराची पाहणी करणार असून, त्यांनी खरातवर लैंगिक शोषण आणि हत्येचे गंभीर आरोप केले आहेत.

मंदिरात काळोखी खोली अन् त्यात...; भोंदू बाबा अशोक खरातचे मोठे रहस्य उलगडणार
Trupti Desai Ashok Kharat
| Updated on: Mar 24, 2026 | 8:19 AM

नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या कृत्यांनी महाराष्ट्र हादरला आहे. आता याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. तृप्ती देसाई आज मिरगाव दौरा करणार आहेत. यावेळी त्या अशोक खरातच्या मिरगाव येथील फार्म हाऊससह ईशान्यश्वर मंदिरातील रहस्यमय काळोख्या खोलीची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. त्यामुळे मोठे गौप्यस्फोट समोर येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच त्या मिरगावसाठी रवाना झाल्या आहेत.

स्वयंघोषित भोंदू बाबा अशोक खरातच्या धक्कादायक कृत्यांमुळे सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक तृप्ती देसाई यांनी आज थेट अशोक खरातच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच मिरगाव येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या दौऱ्यामुळे खरातच्या गुन्हेगारी साम्राज्यातील अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तृप्ती देसाई यांनी या दौऱ्यापूर्वी अशोक खरातवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरातची ईशान्यश्वर मंदिरात काळोखी खोली होती. या खोलीचा वापर महिलांच्या लैंगिक शोषणासाठी केला जात असे, असा दावा तृप्ती देसाई यांनी केला आहे. आजच्या दौऱ्यात तृप्ती देसाई या त्या खोलीची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच त्या फार्म हाऊसची पाहणी करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

सध्या गावातील लोक प्रचंड दहशतीखाली आहेत. खरातच्या विरोधात बोलण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती, पण आता लोकांनी मला फोन करून तिथे येण्याची विनंती केली आहे. मी स्वतः त्या काळोख्या खोलीची आणि संपूर्ण फार्म हाऊसची पाहणी करणार आहे, असे तृप्ती देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाला पळ काढण्याचा होता कट 

अशोक खरात केवळ महिलांचे शोषणच करत नव्हता, तर त्याने जमिनी हडपण्याचे मोठे रॅकेट चालवले होते. अशोक खरात हा १२ मार्च २०२६ रोजी ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याने अनेक निष्पाप लोकांना बेपत्ता केले असून काहींची हत्या केल्याचा संशय आहे. लोकांच्या जमिनी कवडीमोल भावाने बळकावणे आणि विरोध करणाऱ्यांचा काटा काढणे, ही त्याची कार्यपद्धती होती, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

आता या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. तृप्ती देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. रुपाली पाटील यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, त्या पक्षात मोठ्या पदाधिकारी नाहीत आणि त्या सतत अनावश्यक विधाने करत असतात. विशेष म्हणजे मी आता थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. येत्या गुरुवारनंतर सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा आणि रुपाली पाटील यांना प्रवक्ते पदावरून हटवावे, अशी मागणी मी त्यांच्याकडे करणार आहे,” असे तृप्ती देसाई यांनी जाहीर केले.

Follow Us