Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या बदलीच्या विषयात परेश रावल यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे ही खास विनंती
Tukaram Mundhe: एफडीएच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाया सुरूच आहेत. आता ज्येष्ठ अभिनेते परेश यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहित देवेंद्र फडणवीसांना एक विनंती केली आहे.

तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून धडाकेबाज कारवायांचं सत्र सुरूच आहे. एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांची ओळख असून सोशल मीडियावर सध्या त्यांच्या कामगिरीचं प्रचंड कौतुक होत आहे. दिलेलं काम अत्यंत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि नियमांनुसार करत असतानाही तुकाराम मुंढेंना आजवर अनेकदा बदल्यांना सामोरं जावं लागलं आहे. आता त्यांच्या बदलीबाबत बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खास विनंती केली आहे. परेश रावल यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर फडणवीसांना टॅग करत ही पोस्ट लिहिली आहे.
परेश रावल यांनी रविवारी 9 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केलं की, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची त्यांच्या सध्याच्या खात्यातून बदली किंवा हकालपट्टी होऊ नये याची खात्री करावी. एक्सवरील पोस्टमध्ये रावल म्हणाले की, मुंढे यांचं संरक्षण करणं आणि त्यांना त्यांच्या विभागात काम करत राहण्याची परवानगी देणं हे मुख्यमंत्र्यांचं प्राधान्य आणि धर्म असलं पाहिजे.
परेश रावल यांची पोस्ट-
‘विनम्रपणे आणि आदराने सांगायचं झाल्यास, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचं हे प्राधान्य आणि धर्म असायला हवा की तुकाराम मुंढे यांचं त्यांनी संरक्षण करावं आणि त्यांची त्यांच्या विभागातून बदली किंवा पदच्युती करू नये’, अशी पोस्ट परेश रावल यांनी लिहिली आहे. आपल्या खंबीर प्रशासकीय भूमिकेसाठी आणि आव्हानात्मक प्रश्न हाती घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंढेंना परेश रावल यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
To put it with humility and respect that it should the priority and Dharm of Honourable CM @Dev_Fadnavis ji to protect Shri @Tukaram_IndIAS that he should not be xfered or shunted out of his department. 🙏🙏🙏
— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 9, 2026
एफडीएचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अनेक धाडसी पावलं उचलली आहेत. मोठमोठ्या रेस्टॉरंट्स, हॉटेल्सपासून उच्च न्यायालयाच्या कँटीनपर्यंत त्यांनी छापेमारी करत कारवाया केल्या आहेत. दुधातील भेसळीबद्दलही त्यांनी धक्कादायक वास्तव सर्वांसमोर आणलं आहे. त्याचप्रमाणे अॅनालॉग पनीरवरही त्यांनी वर्षभरासाठी महाराष्ट्रात बंदी घातली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भेसळयुक्त पनीर, भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, हॉटेलमधील निकृष्ट दर्जाचं जेवण, गुटखा विक्रीवर छापे अशा अनेक मोठ्या कारवाया मुंढेंच्या नेतृत्वाखाली एफडीएनं केल्या आहेत.
