Asim Sarode : तर उद्धव ठाकरेंना मोठा दणका, असीम सरोदेंनी व्यक्त केली भीती; कोर्टातील सुनावणीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट येणार?
आजच्या युक्तिवादात आम्हाला शिवसेना पक्षाचे चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवून टाकावे, अशी मागणीही कामत यांनी केली. सिब्बल यांनीही युक्तिवादाच्या शेवटी अशीच मागणी केली होती.

Asim Sarode : शिवसेना हा पक्ष आणि या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणाचे आहे, हे पुढच्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या याच प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सध्या ठाकरे गटातर्फे वकील देवदत्त कामत आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद मांडला आहे. लवकरच शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होणार आहे. सिब्बल आणि कामत यांनी आपल्या युक्तिवादात अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आणल्या आहेत. निवडणूक आयोगाची भूमिका, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय यावर दोन्ही वकिलांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे निकाल हा ठाकरे गटाच्या बाजूने लागू शकतो, असा दावा काही कायदेतज्ज्ञ करत आहेत. वकील असीम सरोदे यांनीही ठाकरे याांचाच विजय होणार अशी स्थिती आहे, असे सांगितले आहे. हे विधान करताना मात्र त्यांनी एक भीती व्यक्त केली आहे. ही भीती जर सत्य ठरली तर ठाकरे गट अडचणीत येऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय. ते पुण्यात बोलत होते.
असीम सरोदे काय म्हणाले?
असीम सरोदे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना निकाल हा ठाकरे यांच्या बाजूने लोगू शकतो, असा अंदाज व्यक्त केला. हे प्रकरण पुन्हा एकदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवले जाऊ नये किंवा ते मोठ्या खंडपीठाकडे जाऊ नये. तसे झाले तर भविष्यात ठाकरेंची अडचण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. याआधीही त्यांनी सातत्याने ठाकरे हेच या खटल्यात विजयी होतील, असे वारंवार सांगितले आहे.
आजच्या सुनावणीत काय झाले?
दुसरीकडे ठाकरे गटाच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. त्यानंतर ठाकरे यांच्याच बाजूने देवदत्त कामत हे युक्तिवाद मांडत आहेत. आजच्या युक्तिवादात त्यांनी विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाला जास्त महत्त्व आहे. विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय घेतला. तसेच आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा मार्गी न लावता निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षचिन्ह देऊन टाकले, असा युक्तिवाद कामत यांनी केला.
आजच्या युक्तिवादात आम्हाला शिवसेना पक्षाचे चिन्ह मिळणार नसेल तर ते गोठवून टाकावे, अशी मागणीही कामत यांनी केली. सिब्बल यांनीही युक्तिवादाच्या शेवटी अशीच मागणी केली होती. त्यामुळे ठाकरेंची मागणी मान्य होणार का? तसेच सरोदे यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरल्यास, काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.