मनोज जरांगे तुम्ही सुद्ध उपोषण करण्यात कलाकार आहात, इथे अनेक राजकारणीही…, आठवलेंचं मोठं विधान
मनोज जरांगे पाटील हे शनिवारी मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी उपोषणला बसले होते. मागण्या मान्य झाल्यानं त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. जरांगे पाटील यांच्या उपोषणावर प्रतिक्रिया देताना आता रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात असलेल्या विविध मागण्यांसाठी शनिवारी पुन्हा एकदा भर उन्हात उपोषण केलं. दरम्यान सरकारने मागण्या मान्य केल्यानं अखेर मध्यरात्री त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कलाकार म्हणाले होते. यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. तुम्ही सुद्धा उपोषण करण्यात कलाकार आहात, अनेक राजकारणी देखील कलाकार आहेत, असं यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.
पिंपरी चिंचवडमधील घटनेवर प्रतिक्रिया
दरम्यान हातभट्टीची दारू पिल्यामुळे पिंपरी चिंचवडमधील 18 ते 19 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेवर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज अनेक ठिकाणी दारू भट्टी चालतात. पोलिसांनी कारवाई केली तरी देखील सुरूच आहेत. याबाबत पोवलीस आणि राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे आहे. मृतांच्या नातेवाईकांना सरकाने 5 लाख आणि पालिकेनं 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं आहे. यापूर्वी अनेक घटना घडल्या आहेत, हातभट्टीच्या दारूवर कायम स्वरुपी बंदी आली पाहिजे, असं आठवले यांनी म्हटलं आहे.
आम्ही विधान परिषदेची एकही जागा मागितली नाही, देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं आहे की आरपीआयला एक विधानपरिषदेची जागा देण्यात येणार आहे. आता ही आमची मागणी आहे की आम्हाला दोन तरी महामंडळे मिळावीत, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे.
महागाईवर प्रतिक्रिया
दरम्यान देशात सध्या महागाई वाढत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे सामान्य जनतेमध्ये नाराजीची भावना आहे. यावर देखील आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यूद्धामुळे तीन वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. टप्प्या -टप्प्याने हे वाढलेले भाव कमी करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. महागाई कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरू आहे. महागाईचा दर कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सध्या अनेक गोष्टींचे भाव वाढले आहेत. परंतु जेव्हा डॉ . मनमोहन सिंग पंतप्रधान होते, तेव्हा त्याच्या काळात देखील महागाई वाढली होती, असंही यावेळी आठवले यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात बोलत होते.