पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात औरंगाबादेत निदर्शने, मुकुंदवाडीतील शिवरायांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसची घोषणाबाजी

| Updated on: Feb 09, 2022 | 12:50 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली होती. उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत, हातात फलक घेऊन 'मोदी माफी मागो' अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात औरंगाबादेत निदर्शने, मुकुंदवाडीतील शिवरायांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसची घोषणाबाजी
Follow us on

औरंगाबादः पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत काँग्रेसविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील काँग्रेस (Maharashtra Congress) आक्रमक झाली आहे. औरंगाबादमध्येही याचे पडसाद उमटले. आज औरंगाबाद काँग्रेस पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. देशात कोरोनाचा (Corona Lockdown) प्रसार होण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेसच जबाबदार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी लोकसभेत केलेल्या भाषणादरम्यान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय पातळीवरील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे या या वक्तव्यावर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात आजपासून ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार औरंगाबादमध्ये हे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादमध्ये काँग्रेसची निदर्शनं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काँग्रेसवर आरोप करणाऱ्या वक्तव्याचे पडसाद औरंगाबादमध्येही दिसून आले. शहर काँग्रेसच्या वतीने मुकुंदवाडी परिसरात आज बुधवारी आंदोलन करण्यात आले. मुकुंदवाडीतील शिवाजी पुतळ्यासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधानांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

राज्यभरात काँग्रेसचे ‘मोदी माफी मांगो’ आंदोलन

दरम्यान, औरंगाबादप्रमाणेच राज्यभरात आजपासून काँग्रेस पंतप्रधानांविरोधात आंदोलन करत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली होती. उद्या सर्व भाजप कार्यालयांसमोर आम्ही महाराष्ट्राच्या झालेल्या अपमानाचा निषेध करणार आहोत, हातात फलक घेऊन ‘मोदी माफी मागो’ अशी मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

पंतप्रधानांच्या कोणत्या वक्तव्याचा निषेध?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. मात्र काँग्रेसवाले परिस्थिती बिघडण्याची वाट पहात होते. जागतिक आरोग्य संघटना सांगत होती की, लोकांनी आहे तिथेच थांबावे. परंतु काँग्रेसने तेव्हा महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता.

इतर बातम्या-

Spices Price | मिरचीसह मसाल्यांना महागाईचा ठसका, खसखस व लवंगला सोन्याचा भाव…

Nashik Corona | भय इथले संपत नाही, नाशिकमध्ये कोरोनामुळे पुन्हा तिघांचा मृत्यू; काय आहे आजचा अहवाल?