औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा

| Updated on: Feb 20, 2022 | 10:45 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र योजनेची कामं अत्यंत संथगतीनं सुरु आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

औरंगाबादच्या पाणीपुरवठा योजनेच्या गतीवर प्रश्नचिन्ह, भाजप रस्त्यावर उतरणार, डॉ. भागवत कराड यांचा इशारा
Follow us on

औरंगाबादः शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad municipal Corporation) वतीने 1680 कोटीच्या बजेटची पाणीपुरवठा योजना (Water supply scheme) राबवली जात आहे. मात्र या योजनेची कामं अत्यंत संथ गतीनं सुरु आहेत. योजनेच्या धीम्या गतीवर आजवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आता याविरोधात भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातल्या पाणीपुरवठा योजनेची गती वाढवा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा डॉ. भागवत कराड यांनी दिला आहे. आता यावर महापालिका आणि शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे योजना?

औरंगाबादमध्ये डिसेंबर 2020 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन झाले. ही योजना पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. सध्या औरंगाबाद शहराला जुन्या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र अवाढव्य विस्तारलेल्या शहराला जुन्या योजनेचा पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. सध्या औरंगाबाद शहराला सहा ते आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. नवी योजना कार्यान्वित झाल्यानंतर औरंगाबादकरांना 24 तास पाणीपुरवठा केला जाणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 1680 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यातला 30 टक्के वाटा अर्थात 630 कोटी रुपये औरंगाबाद महापालिका भरणार आहे. तर 1 हजार 80 कोटी रुपये राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या राज्य सरकारच्या विभागाकडून या योजनेचं काम पूर्ण करणार आहे.

डॉ. भागवत कराड यांचा इशारा

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या योजनेचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वास येणे अपेक्षित होते. मात्र योजनेची कामं अत्यंत संथगतीनं सुरु आहेत. त्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेची कामं ज्या गतीने सुरु आहेत, ती पाहता दिलेल्या मुदतीत ती पूर्ण होतील, असं वाटत नाही. त्यामुळे नागरिकांना दररोज पाणी मिळावे, यासाठी आम्ही निश्चित आवाज उठवणार आहोत.योजनेचे काम वेगाने झाले नाही तर या मुद्द्यावरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेला धारेवर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचा मुद्दा उचलून धरला जाणार आहे, त्याचेच हे संकेत आहेत.

इतर बातम्या-

Zodiac : ‘या’ 4 राशींसाठी पुढील पाच दिवस सुगीचे, अत्यंत महत्वाची कामे मार्गी लागतील आणि यश तुमच्या पदरामध्ये पडेल!

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?